ओढ्याच्या पाण्यात अर्धवट जळालेले प्रेत वाहून गेले, लातूर जिल्ह्यातील घटना

By राजकुमार जोंधळे | Updated: June 8, 2025 05:33 IST2025-06-08T05:33:46+5:302025-06-08T05:33:58+5:30

Latur News: लातूर जिल्ह्यातील भडी गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी रात्री घडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रेत वाहून गेले आणि नंतर गावातील युवकांनी एकत्र येत प्रेतावर पुन्हा अंत्यसंस्कार केले.

Partially burnt body washed away in stream water, incident in Latur district | ओढ्याच्या पाण्यात अर्धवट जळालेले प्रेत वाहून गेले, लातूर जिल्ह्यातील घटना

ओढ्याच्या पाण्यात अर्धवट जळालेले प्रेत वाहून गेले, लातूर जिल्ह्यातील घटना

- राजकुमार जाेंधळे 

लातूर- जिल्ह्यातील भडी गावामध्ये मन हेलावून टाकणारी घटना शनिवारी रात्री घडली. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ओढ्याला आलेल्या पाण्यात प्रेत वाहून गेले आणि नंतर गावातील युवकांनी एकत्र येत प्रेतावर पुन्हा अंत्यसंस्कार केले.

भडी येथील ऋत्विक दगडू कांबळे (वय २०) हा युवक बांधकाम मजूर म्हणून काम करत हाेता. नेहमीप्रमाणे ताे लातूर शहरानजीक १२ नंबर पाटी येथे एका बांधकामावर गेला हाेता. दरम्यान, तेथे त्याचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याचे प्रेत लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. संतप्त नातेवाईकांनी शुक्रवारी सायंकाळपर्यंत हे प्रेत ताब्यात घेतले नाही. शनिवारी सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास नातेवाईकांनी प्रेत ताब्यात घेत भडी गाव गाठले. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ओढ्याच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर नातेवाईक आपापल्या घरी परतले. दरम्यान, सायंकाळी माेठा पाऊस झाला अन् ओढ्याला पूर आला. पुराच्या पाण्यात जळणारे प्रेत वाहून गेले. हा प्रकार गावातील काही तरुणांनी पाहिला. त्यांनी ओढ्यातील वाहत जाणारे प्रेत ताब्यात घेतले आणि ओढ्याच्याच काठावर पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले. ही हृदय पिळवटून टाकणारी घटना भडी (ता.जि. लातूर) येथे घडली. मयत युवक ऋत्विक कांबळे याच्या पश्चात आई आणि आजी आहे.

घरात एकटाच कमवता...
मयत ऋत्विक कांबळे हा युवक घरातील एकटाच कमावता होता. त्याच्यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. ताे अविवाहित असून, आई आणि आजीचा एकमेव आधार हाेता, अशी माहिती गावातील नातेवाईकांनी दिली.

स्मशानभूमीचा प्रश्न कायम...
स्मशानभूमी नसल्याने ओढ्याच्या काठावरच अंत्यसंस्कार केले जातात. शनिवारी याच ओढ्याच्या काठावर मयत ऋत्विक कांबळे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, माेठ्या पावसामुळे ओढ्याला पूर आला आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेतील प्रेत पुराच्या पाण्यात वाहून जाताना तरुणांनी पाहिले. ही विटंबना पाहून तरुणांनी पुन्हा त्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार केले. स्मशानभुमीचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Partially burnt body washed away in stream water, incident in Latur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर