नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेने बंद केले प्रभागातील बोअर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:18 IST2021-05-01T04:18:22+5:302021-05-01T04:18:22+5:30

निलंगा पालिकेच्या वतीने शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. नवीन जलवाहिनीचे नागरिकांना नळ कनेक्शन घ्यावे, असे आवाहन सातत्याने करण्यात ...

The municipality closed the boreholes in the ward to take the tap connection | नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेने बंद केले प्रभागातील बोअर बंद

नळ कनेक्शन घेण्यासाठी पालिकेने बंद केले प्रभागातील बोअर बंद

निलंगा पालिकेच्या वतीने शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात येत आहे. नवीन जलवाहिनीचे नागरिकांना नळ कनेक्शन घ्यावे, असे आवाहन सातत्याने करण्यात येत आहे. त्या आवाहनास प्रतिसाद देत शहरातील काही नागरिकांनी नळ कनेक्शनही घेतले आहे. मात्र, काही जण ते घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. कारण शहरातील प्रत्येक प्रभागात पालिकेचे बोअर असून तेथील पाण्याचा नवीन नळ कनेक्शन न घेतलेले नागरिक वापर करीत आहेत.

दरम्यान, पालिकेने नळ कनेक्शन योजना पूर्ण व्हावी म्हणून नवा मार्ग अवलंबित स्थानिक बोअरचे कनेक्शन बंद केले आहे. त्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी तारांबळ होत आहे. शहरातील गांधीनगर प्रभागात नवीन जलवाहिनीचे काम अद्याप पूर्णत्वास आले नाही. काही ठिकाणचे काम शिल्लक आहे. तसेच लिकेज काढणे सुरू आहे. अशा परिस्थितीत पालिकेने नळ योजनेेचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी स्थानिक बोअर बंद करून नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रयत्न करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

शुक्रवारी पालिकेचे मुख्याधिकारी मल्लिकार्जुन पाटील यांना गांधीनगर भागातील नागरिकांच्या शिष्टमंडळाने भेटून प्रभागातील अडचणी मांडल्या. यावेळी सत्ताधारी नगरसेवक पती अनिल उजळे यांच्यासह हरिभाऊ सगरे, ॲड. धनराज मंठाळे, सचिन मोघे, अविनाश खोत, माधव काटवटे, श्याम म्हेत्रे, परिक्षित राजमल्ले, धनराज काटवटे, आकाश काटवटे, सुनील सावरे, माधव पवार, रोहिदास शेंडगे, विशाल उजळे, माधव सूर्यवंशी, संतोष सूर्यवंशी, शुभम लखणे आदी उपस्थित होते.

नागरिकांची टाळाटाळ, योजनेस अडसर...

नवीन नळजोडणीसंदर्भात डिसेंबरपासून नगरपालिकेची २२ पथके गल्लोगल्ली फिरून तसेच घरोघरी जाऊन नळजोडणी करून घेण्याचे आवाहन करीत आहेत; परंतु काही नागरिकांनी टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे सदरील जलयोजना पूर्णत्वास येण्यास विलंब होत आहे. यापूर्वीही नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे यांनी नवीन कनेक्शन जोडणीचे आवाहन केले होते. जुनी जलवाहिनी व विंधन विहिरीवरून पुरवठा बंद होणार आहे, अशा सूचनाही केल्या होत्या.

- मल्लिकार्जुन पाटील, मुख्याधिकारी.

समस्येमुळे पाणी बंद...

शहरातील नागरिकांनी प्रतिसाद न दिल्यामुळे पहिल्या टप्प्यात पांचाळ कॉलनी, एस.टी. कॉलनी, महात्मा बसवेश्वरनगर, लोंढेनगर, अडत लाइन परिसर, रामकृष्ण नगर, दत्तनगर आदी भागांना एमआयडीसीतील जलकुंभातून पाणीपुरवठा होतो. या कनेक्शनचे काम पूर्ण होण्यासाठी विंधन विहिरीवरील पुरवठा बंद करण्यात आला. त्यामुळे या भागातील १९५० नळ कनेक्शन जोडणी पूर्ण झाली आहे, असे मुख्याधिकाऱ्यांनी सांगितले.

४ हजार नळकनेक्शन पूर्ण...

दुसऱ्या टप्प्यात पालिका कार्यालयाजवळच्या जलकुंभातून म्हाडा वसाहत, दत्तनगर, नारायणनगर, औरंगपुरा परिसर, दादापीर दर्गा परिसर, गांधीनगर, अण्णाभाऊ साठेनगर, कोळी गल्ली, दापका वेस, महादेव गल्ली, देशपांडे गल्ली, मारवाडी गल्ली, ब्राह्मण गल्ली, माळी गल्ली, खारवणी गल्ली या भागातील नळ कनेक्शनचे काम सुरू आहे. सदरील काम पूर्ण होण्यासाठी वरील परिसरातील पुरवठा खंडित केला आहे. ६ हजार ५०० पैकी ४ हजार नळ कनेक्शन पूर्ण झाले आहेत. उर्वरित २ हजार ५०० कनेक्शन पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, असे मुख्याधिकारी पाटील म्हणाले.

नळजाेडणी करून घ्यावी...

नवीन नळ कनेक्शन जोडणी उर्वरित नागरिकांनी करून घ्यावी. पाणीपुरवठा सुरळीत झाला की, संपूर्ण शहरातील रस्त्याची कामे पूर्ण होणार आहेत. त्यानंतर कोणी नळ कनेक्शन मागितल्यास मोठे जिकिरीचे ठरणार आहे, असे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे म्हणाले.

Web Title: The municipality closed the boreholes in the ward to take the tap connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.