कायद्याच्या परीक्षेत प्राचार्यांसह गुणवंत विद्यार्थी नापास; विद्यापीठाच्या तपासणीवर आक्षेप
By राजकुमार जोंधळे | Updated: March 1, 2026 00:16 IST2026-03-01T00:15:40+5:302026-03-01T00:16:37+5:30
या संदर्भात ४७ विद्यार्थ्यांनी स्वाक्षरीनिशी राज्यपाल तसेच स्वारातीम विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दाद मागितली आहे.

कायद्याच्या परीक्षेत प्राचार्यांसह गुणवंत विद्यार्थी नापास; विद्यापीठाच्या तपासणीवर आक्षेप
राजकुमार जाेंधळे, लातूर: स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने हिवाळी २०२५ च्या सत्र परीक्षेत विधि शाखेतील उत्तरपत्रिका तपासणीत दाखविलेला कठोरपणा विद्यार्थ्यांना मानसिक धक्का देणारा ठरला आहे. मागील दोन वर्षांत गुणवत्ता यादीत आलेले, नियमित महाविद्यालयात येणारे एलएल.बी.च्या तिसऱ्या वर्षातील ६० टक्के लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर नापासाचा शिक्का बसला आहे. विशेष म्हणजे गुणवंत विद्यार्थ्यांबरोबर एलएल.बी.चे शिक्षण घेणारे काही प्राचार्य, माजी प्राचार्य, निवृत्त प्राध्यापकदेखील नापासची गुणपत्रिका घेऊन विद्यापीठाचे दरवाजे ठोठावत आहेत.
या संदर्भात ४७ विद्यार्थ्यांनी स्वाक्षरीनिशी राज्यपाल तसेच स्वारातीम विद्यापीठाच्या कुलगुरुंकडे दाद मागितली आहे. एलएल.बी.च्या पाचव्या सत्राचे गुणपत्रक विद्यार्थ्यांच्या हाती पडल्यानंतर ते चक्रावून गेले. यापूर्वीही अधिकांश विद्यार्थी पुनर्तपासणीमध्ये उत्तीर्ण झाले अथवा त्यांचे १० टक्क्यांपर्यंत गुण वाढल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ असल्याचे स्पष्ट होते. त्याबाबत विद्यार्थ्यांनी कितीही पत्रव्यवहार केला तरी विद्यापीठाकडून दखल घेतली जात नाही. पुनर्तपासणीचा निकाल विलंबाने लागतो. पुढच्या परीक्षेची अर्ज भरण्याची तारीख निघून जाते.
हिवाळी २०२५ मध्ये एलएल.बी.च्या पाचव्या सत्रातील विद्यार्थ्यांनी सिव्हिल प्रोसिजर कोड, भारतीय साक्ष अधिनियम २०२३, एनविरॉन्मेंटल लॉ, पब्लिक इंटरनॅशनल लॉ, लॅन्ड लॉ या पाचही विषयांच्या उत्तरपत्रिका पुन्हा तपासाव्यात, अशी लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मागणी आहे.
अनुभवी अधिव्याख्यात्यांचा अभाव
विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे शेवटचे वर्ष असल्यामुळे एका गुणाचा जरी फरक पडला तरी विद्यार्थी न्यायाधीश होण्याच्या परीक्षेपासून वंचित राहतात. त्यामुळे अनुभवी अधिव्याख्यात्यांकडून उत्तरपत्रिका तपासून घेणे अपेक्षित असताना त्यांचा अभाव असल्याचे यंत्रणा कबूल करते. विद्यार्थी नापास झाले की पुनर्तपासणीसाठी प्रत्येक उत्तरपत्रिकेसाठी ३६० रुपये शुल्क आणि छायांकित प्रतीसाठी ५२० रुपये भरावे लागतात.
विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण
राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत स्वारातीम विद्यापीठातील शैक्षणिक अभ्यासक्रम, महाविद्यालय आणि गुणवत्ता चांगली असल्याने विद्यार्थी प्रवेश घेतात. परंतु, यंत्रणेतील त्रुटीमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. पुनर्तपासणीला ३६० रुपये घेतले जातात आणि तपासणी करणाऱ्यास ६ ते ८ रुपये दिले जातात. ज्याचा निकालावर परिणाम दिसत आहे. अंतिम वर्षातील गुणवत्ता यादीत असणारे, न्यायाधीश परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी नापास झाल्याने त्यांचे खच्चीकरण झाले आहे.
-रघुनाथ कुलकर्णी, विद्यार्थी, लातूर