उजनी : शेतात शेडचे काम करत असताना, विजेच्या धक्क्याने एका ५० वर्षीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना औसा तालुक्यातील उजनी शिवारात बुधवारी घडली. मात्र, याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा संतप्त नातेवाईकांनी घेतला. यामुळे काही काळ उजनी येथील रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण हाेते. यावेळी भादा पाेलिसांनी मृताच्या नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर तणाव निवळला. याबाबत भादा पाेलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली आहे. पाेलिसांनी सांगितले, युवराज बब्रुवान जाेगदंड (वय ५०, रा़ उजनी, ता. औसा) हे शेतकरी सिद्धेश्वर गंगणे यांच्या शेतात शेड तयार करण्याच्या कामासाठी गुत्तेदार अहमद देशमुख यांच्यासाेबत गेले हाेते. दरम्यान, शेडचे काम सुरु असताना अचानक युवराज जाेगदंड हे जमिनीवर काेसळले. त्यांना उपचारासाठी शेतकरी आणि गुत्तेदाराने उजनी येथील आराेग्य केंद्रात दाखल केले. यावेळी तेथील डाॅक्टरांनी मजूर युवराज जाेगदंड यांना मृत घाेषित केले. विजेच्या धक्क्याने या मजुराचा मृत्यू झाल्याचे डाॅ. राजपाल कदम यांनी सांगितले. त्यामुळे संबंधित शेतकरी आणि गुत्तेदारावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आपण मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मयताचे कुटुंबीय व नातेवाईकांनी घेतला. यावेळी भादा येथील पाेलीस अधिकारी, कर्मचारी दाखल झाले. पाेलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन देत मध्यस्थी करुन नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर आराेग्य केंद्रातील तणाव निवळला. मयत युवराज जाेगदंड यांच्या पश्चात पत्नी, दाेन मुली, मुलगा असा परिवार आहे.
याविषयी मयताचा भाऊ शिवाजी जाेगदंड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन भादा पाेलीस ठाण्यात घटनेची नाेंद करण्यात आली आहे.