तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
By राजकुमार जोंधळे | Updated: September 17, 2024 22:09 IST2024-09-17T22:09:05+5:302024-09-17T22:09:59+5:30
शेतकरी त्रिपती बाबुराव पवार (वय ४२) आणि मुलगा नामदेव त्रिपती पवार (वय १२) हे दोघेही बैल धुण्यासाठी गावानजीक असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते

तलावातील पाण्यामध्ये बुडून बाप-लेकाचा मृत्यू; लातूर जिल्ह्यातील माळहिप्परगा येथील घटना
राजकुमार जोंधळे, जळकोट (जि. लातूर): बैल धुण्यासाठी गेलेल्या बाप-लोकाचा तलावातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना जळकोट तालुक्यातील माळहिप्परगा येथे मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
माळहिप्परगा येथील शेतकरी त्रिपती बाबुराव पवार (वय ४२) आणि मुलगा नामदेव त्रिपती पवार (वय १२ ) हे दोघेही बैल धुण्यासाठी गावानजीक असलेल्या पाझर तलावाकडे गेले होते. दरम्यान, बैल धुवून बाहेर निघताना बैलजोडी पाण्यामध्ये खोल ठिकाणी जात होते. मुलगा नामदेव हा बैलाला बाजूला घेण्यासाठी जात असताना, पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडत होता, नाका-तोंडात पाणी गेल्याने गुचक्या देत होता. वडील त्रिपती हे मुलाला बाहेर काढण्यासाठी गेले असता, मुलगा वडिलाच्या गळाल्या पडला. त्यामुळे दोघेही गाळात अडकले.
याची माहिती शेजारी असलेल्या शेतकऱ्यांना मिळताच त्यांनी आरडा-ओरडा केल्याने नागरिक घटनास्थळी जमले. नागरिकांनी तलावात उतरून वडील आणि मुलाला दोघांना बाहेर काढले. या घटनेची माहिती मिळताच जळकोट ठाण्याचे पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट देऊन, पंचनामा केला. दोघाचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी जळकोट येथील ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले आहे.
घटनेने गावावर शोककळा; एकाच सरणावर अंत्यसंस्कार...
एकाच सरणावर वडील आणि मुलावर अंत्यसंस्कार करण्याची दुर्दैवी वेळ आल्याने गावावर शोककळा पसरली. मंगळवारी रात्री शवविच्छेदना नंतर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियाकडून देण्यात आली.