स्मशानभूमीतील शेडचे निष्कृष्ट काम; पेटलेल्या चितेवर पावसाचे पाणी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:25 IST2021-08-25T04:25:26+5:302021-08-25T04:25:26+5:30
चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक वर्षांपासून समस्या आहेत. पावसाचे ...

स्मशानभूमीतील शेडचे निष्कृष्ट काम; पेटलेल्या चितेवर पावसाचे पाणी !
चाकूर : शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीतील शेडचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक वर्षांपासून समस्या आहेत. पावसाचे पाणी शेडच्या मध्यभागातून पेटलेल्या चितेवर पडते आणि प्रेताची अवहेलना होते. या ज्वलंत प्रश्नाकडे लक्ष देण्यास प्रशासनाला वेळ नाही. सोमवारी रात्री भर पावसात अंत्यसंस्कार करताना पेटविलेल्या चितेवर छतावरून पावसाचे पाणी पडत होते, याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
चाकूर शहरातील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नातेवाईक, मित्रपरिवार सोमवारी रात्री ९ च्या सुमारास सार्वजनिक स्मशानभूमीत गेले. स्मशानभूमीत प्रेतावर सरण रचण्यात आले. प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी भडाग्नी देण्यात आली. दरम्यान, पावसाने चांगलाच जोर धरला. शवदाहिनीत मध्यभागातून पाऊस पडत होता. तर प्रेत जाळण्यासाठी अग्नी पेटविण्यात आला. वरून पाऊस थेट चितेवर पडत होता. त्यामुळे स्मशानभूमीतील सुभाष मुकूटमोरे हे चितेवर पाणी पडू नये. म्हणून टोपल्यात पाणी घेण्याचा प्रयत्न करत होते. पावसाचा चांगलाच जोर असल्याने पेटलेल्या चितेवर पाणी पडत होते. नातेवाइकांना पावसात थांबण्यासाठी स्मशानभूमीत आडोसा नाही. या परिस्थितीमुळे मित्र, नातेवाइकांनी घराकडे जाण्याला प्राधान्य दिले. मोजकेच जवळचे लोक पावसातच थांबून प्रेत पूर्णपणे जळण्यासाठी प्रयत्न करत होते. त्या वेळी पावसाचे पाणी चितेवर पडू नये म्हणून टोपले धरणारा मुकूटमोरे यांच्या हाताला आगीची झळ बसली. स्मशानभूमीत २००७ मध्ये एक पत्र्याची शवदाहिनी करण्यात आली. त्यानंतर सन २००९ मध्ये सिमेंटची शवदाहिनी ग्रामपंचायतीच्या काळात तयार करण्यात आली. या शववाहिनीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत प्रेतावर अंत्यसंस्कार करणे अवघड आहे. २०१५ मध्ये ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाले. परंतु, या निकृष्ट बांधकामाकडे आजतागायत कोणाचेही लक्ष गेले नाही. पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी जमलेल्या लोकांना थांबण्यासाठी साधी शेडसुद्धा या ठिकाणी नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्मशानभूमीत बांधण्यात आलेल्या या निकृष्ट दर्जाच्या शवदाहिनीच्या कामाची चौकशी होणार काय, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सध्या नगरपंचायतीवर प्रशासक आहे. शवदाहिनीच्या वरच्या भागातून पाणी गळते. त्याची तत्काळ दुरुस्ती करून घेण्यात येणार आहे. नवीन शवदाहिनीसाठी प्रयत्न सुरू आहेत. - अजिंक्य रणदिवे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, चाकूर