आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:15 IST2021-06-26T04:15:24+5:302021-06-26T04:15:24+5:30
औसा (जि. लातूर) : काँग्रेसला आम्हाला सोडायचे नाही, मात्र तुम्हीही कोठे जाऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा ...

आम्हाला सोडायचे नाही, तुम्हीही कुठे जाऊ नका !
औसा (जि. लातूर) : काँग्रेसला आम्हाला सोडायचे नाही, मात्र तुम्हीही कोठे जाऊ नका, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी औसा येथे कार्यक्रमात दिला. सध्या महाराष्ट्रात काँग्रेसकडून स्वबळाचे फारच चालले आहे. त्यावर काय बोलावे म्हणून आम्ही गप्प आहोत. तुम्हाला कधीच दूर करायचे नाही. तुमच्याशिवाय आमचे नाही आणि आमच्याशिवाय तुमचे नाही. दोघेही एकमेकांना पूरक आहोत. आमच्या मनात वेगळे असे काही नाही. आम्हाला तुमच्याबरोबरच जायचे आहे.
महामंडळाचे वाटप समसमान
राज्यातील महामंडळाचे वाटप तिन्ही पक्षांमध्ये समसमान पद्धतीने केले जाणार आहे. तसा निर्णय झाला आहे. ओबीसींचे आरक्षण पुन्हा मिळवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. निवडणुकीनंतर ही महाविकास आघाडी झाली असून, तिन्ही पक्ष एकत्रित चांगले काम करत आहेत. शिवाय हे सरकार पाच वर्षे राज्य करेल, असेही ते म्हणाले.
दोघांचाच बोलबाला... आम्हालाही सोबत घ्या...
काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ते म्हणाले, सरकार तीन पक्षांचे आहे. पण दोघांचाच बोलबाला दिसत आहे. आघाडीत काँग्रेसही आहे. आम्हालाही तुमच्यासोबत घ्या, असे पाटील म्हणाले. त्यावर जयंत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी जुने मित्र आहेत. परस्परांना पूरक असल्याचे भाषणात सांगितले.