कोल्हापूर : कोल्हापूर शहर तसेच जिल्ह्यात सर्वत्र रविवारी दिवसभरात अधूनमधून पावसाची सरी कोसळत राहिल्या. धरण क्षेत्रातही पाऊस सुरू असून, पाणी साठ्यात वाढ होत आहे. आज, सोमवारपासून दोन दिवस हवामान विभागाने जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ दिला आहे.गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत रविवारी अधूनमधून का असेना पण पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. कोल्हापूर शहर परिसरात पावसाची एक जोरदार सर कोसळून गेली की लगेच ऊन पडत होते. दाटून आलेले आकाश एकदम रिकामे होत असे. दिवसभर हा ऊन-पावसाचा खेळ श्रावण महिन्याची अनुभूती देत राहिला.गगनबावडा, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, आजरा व राधानगरी तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. रविवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी ११.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. धरणक्षेत्रातही सरासरी ७० मिलिमीटर पाऊस कोसळला. वारणा धरणातून १७१५, तर दूधगंगेतून १६०० घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पण, राधानगरी धरणातून प्रतिसेकंद ३१०० घनफूट विसर्ग कायम असल्याने भोगावती व पंचगंगा नदीची पातळी हळूहळू कमी होत आहे.अद्याप ३६ बंधारे पाण्याखाली असून, जिल्ह्यात सहा ठिकाणी खासगी मालमत्तांची पडझड होऊन १ लाख ५५ हजारांचे नुकसान झाले आहे. आगामी दोन दिवस जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’, तर बुधवारी (दि. २) जिल्ह्यातील घाट माथ्यावरील तालुक्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणसाठा..धरणसाठा - टीएमसीत - कंसात क्षमता
- राधानगरी - ५.५१ - (८.३४)
- तुळशी - २.११ - (३.४१)
- वारणा - २२.९९ - (३४.३९)
- दूधगंगा - ११.७९ - (२५.३९)
- कासारी -१.६७ - (२.७७)
- कडवी - १.६६ - (२.५३)
- कुंभी - १.७७ - (२.७१)
- पाटगाव - २.६५ - (३.७१)