वसंतदादांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान : राजा माने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 12:57 AM2017-11-15T00:57:39+5:302017-11-15T01:00:03+5:30
कोल्हापूर : वसंतदादा पाटील हे एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना एकत्र आणण्याचे काम केले.
![Vasantdad's contribution to rural development: Raja Mane | वसंतदादांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान : राजा माने Vasantdad's contribution to rural development: Raja Mane | वसंतदादांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान : राजा माने](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/raja-mane_20171128912.jpg)
वसंतदादांचे ग्रामीण विकासात मोठे योगदान : राजा माने
कोल्हापूर : वसंतदादा पाटील हे एक दूरदृष्टी असणारे नेते होते. त्यांनी व्यापारी, कारखानदार आणि शेतकरी यांना एकत्र आणण्याचे काम केले. त्यामुळे ग्रामीण विकासात वसंतदादांचे मोठे योगदान राहिले आहे, अशा शब्दांत लोकमत सोलापूर आवृत्तीचे संपादक राजा माने यांनी वसंतदादांच्या कार्याचा गौरव केला.
वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दीनिमित्त शिवाजी विद्यापीठातील राज्यशास्त्र विभाग, गांधी सेंटर आणि यशवंतराव चव्हाण स्कूल रुरल डेव्हलपमेंट यांच्यावतीने आयोजित ‘ग्रामीण विकासामध्ये वसंतदादा पाटील यांचे योगदान’ या चर्चासत्रात प्रमुख वक्ते म्हणून माने बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार दशरथ पारेकर होते.
राजा माने म्हणाले, वसंतदादांनी सहकारमहर्षी पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या कार्यातून प्रेरणा घेत ग्रामीण विकासाचे काम केले. सांगली परिसरात त्यांनी सहकारातून साखर कारखाना उभारला, तसेच ठिकठिकाणी पाणलोट क्षेत्र निर्माण केले. त्यामुळे या परिसरातील शेतकरी ऊसशेतीकडे वळला. जायकवाडी धरणाचे काम करताना पाटबंधारे खात्याची धुरा वसंतदादांकडे होती. या धरणाच्या पहिल्या टप्प्यातील कामात चार कोटी रुपयांची बचत बांधकाम अधिकाºयांनी केली होती.
यामुळे वसंतदादांनी तत्काळ धरणाचे काम करणाºया शिपाईपासून ते अधिकाºयांपर्यंत चार लाख रुपये बक्षीस म्हणून दिले होते. इतका त्यांचा कारभार पारदर्शी होता, असे माने म्हणाले. यावेळी दशरथ पारेकर म्हणाले, वसंतदादा माणूस म्हणून खूप मोठी व्यक्ती होती. सर्वसामान्यांच्या कामासाठी ते कुठलाही प्रोटोकॉल पाळत नसत. जिथल्या तिथे ते काम निपटत असत. यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील यांच्यात तणाव असला तरी एकोपा होता.
चर्चासत्रात प्रा. डॉ. भारती पाटील , प्रा. डॉ. प्रकाश पवार यांनीही वसंतदादांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू उलगडले. चर्चासत्राचे आयोजन प्रा. गजानन साळुंखे, प्रा. वैशाली भोसले यांनी केले होते.
उचित स्मारकाची खंत
वसंतदादांनी राज्यासाठी मोठे योगदान दिले असले तरी, राज्य सरकारने त्यांच्या कार्याला शोभेल असे उचित स्मारक उभारले नसल्याची खंतही राजा माने यांनी यावेळी व्यक्त केली.