कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीत अडचण आल्याने थोडा बाजूला गेलो होतो, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसशी अतूट नाते आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाच्या आपण बाहेर नाही, त्यांच्या सल्ल्यानेच उद्धवसेनेत गेल्याचा गौप्यस्फोट माजी आमदार के.पी. पाटील यांनी केला.राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापनदिन मंगळवारी (दि. १०) पुण्यात बालेवाडी स्टेडियमला होत आहे. त्याच्या तयारीसाठी शुक्रवारी शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते.के.पी. पाटील म्हणाले, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासारखे वादळ जिल्ह्यात आहे. हिमालयासारखे ते नेते आहेत, पण ते केवळ मोठे होऊन चालणार नाही, छोट्या छाेट्या कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे. आपण सत्तेत आहोत, आमच्या हक्काचा व सन्मानाचा वाटा मिळवून देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ताकदीने कामाला लागा, महायुतीचा झेंडा फडकवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल राहण्यासाठी प्रयत्न करूया. पक्षाच्या वर्धापनदिनाला जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.‘गोकुळ’चे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांचा सत्कार पक्षाच्यावतीने करण्यात आला. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, ‘गोकुळ’चे संचालक युवराज पाटील, रणजीतसिंह पाटील, प्रा. किसन चौगले, जिल्हा बँकेचे माजी संचालक मानसिंगराव गायकवाड, पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे, शहराध्यक्ष आदिल फरास, मधुकर जांभळे आदी उपस्थित होते. शीतल फराकटे यांनी आभार मानले.शड्डू ठोकून तयारचएका अपयशाने खचून जायचे नाही, मी सहा निवडणुका लढवल्या. दोन वेळा विजयी झालो, तरीही ९० हजार मताचा गठ्ठा कायम आहे. भाजपने दोन खासदारांच्या बळावर देशात सत्ता मिळवली, त्यामुळे डगमगून जाऊ नका. अजित पवार व हसन मुश्रीफ हे आमच्या आई आहेत, त्यामुळे कोण वाटेल ते अंगावर येऊ दे, आम्ही शड्डू ठोकून तयारच असल्याचे के.पी. पाटील यांनी सांगितले.
‘नविद’नी जादू करावी..आम्ही सगळ्यांनी एकवाक्यतेने ‘नविद’ यांच्यावर ‘गोकुळ’ अध्यक्षपदाची धुरा सोपवली आहे. निवडणुकीला वर्ष राहिले आहे, त्यांनी वर्षात अशी जादू करावी की पुन्हा संघाची धुरा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यावी, त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागूया, असे आवाहनही के.पी. पाटील यांनी केले.