जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 19:12 IST2021-07-14T19:11:16+5:302021-07-14T19:12:38+5:30
Rain Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीची पातळी २४ फुटापर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरु असून नद्यांची पाणी पातळीत वाढ होत आहे. बुधवारी पंचगंगा नदीची पातळी २४ फुटावर पोहचली असून यामध्ये तरुणांनी पोहण्याचा आनंद घेतला. (छाया- आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : जिल्ह्यात बुधवारी पावसाची रिपरिप कायम राहिली. धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असून पंचगंगा नदीची पातळी २४ फुटापर्यंत पोहचली आहे. जिल्ह्यातील बारा बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीसी विस्कळीत झाली आहे.
चंदगड, आजरा, भुदरगड तालुक्यात पाऊस चांगला सुरु आहे. उर्वरित तालुक्यात उघडझाप सुरु असून अधून मधून पावसाच्या सरी कोसळत राहिल्या. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस सुुरु असून बुधवारी सकाळी आठ वाजता संपलेल्या चोवीस तासात कोदे धरणक्षेत्रात १७२, कुंभी १५० तर पाटगाव ११९ मिली मीटर पावसाची नोंद झाली.
धरणातून विसर्ग कायम असून राधानगरीतून प्रतिसेंकद १२००, दूधगंगेतून १०० तर वारणातून ७०० घनफुट पाणी नदीत येत आहे. त्याचबरोबर पाटगाव मधून ९६० तर कोदे लघु पाटबंधारे मधून ८५८ घनफुट पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ होत आहे. पंचगंगा नदीची पातळी २४ फुटावर गेली असून बारा बंधारे पाण्याखाली आहेत. बहुतांशी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून आजूबाजूच्या शिवारात घुसले आहे.