Kolhapur: पन्हाळा-पावनखिंडीत 'हर हर महादेव' घुमणार, शिवभक्तांना पदभ्रमंती मोहिमेचे वेध; नियोजित तारखा..जाणून घ्या
By संदीप आडनाईक | Updated: June 27, 2025 14:09 IST2025-06-27T14:08:15+5:302025-06-27T14:09:46+5:30
हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी आणि या स्फूर्तिदायी घटनेला उजाळा देण्यासाठी हजारो शिवभक्त या मोहिमेत सहभागी होतात

संग्रहित छाया
संदीप आडनाईक
कोल्हापूर : जुलै महिन्याची चाहूल लागताच जशी पंढरीच्या वारीची ओढ भक्तांना लागते, तसेच वेध शिवभक्तांना पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंतीचे लागतात. या महिन्यात विविध संघटनांकडून पन्हाळगडापासून विशाळगडाच्या पायथ्यापर्यंत चालत जाण्यासाठी मोहिमा आयोजित करतात. देश-विदेशातून अनेक शिवभक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात. गतवर्षात एक लाखाहून अधिक लोकांनी विविध मोहिमांशिवाय सहल म्हणून या परिसराला भेट दिल्याचा अंदाज आहे. यंदाही तितक्याच संख्येने लोक भेट देण्याची शक्यता आहे.
पन्हाळगड ते विशाळगडचा रणसंग्राम १२ आणि १३ जुलै १६६० यादरम्यान घडला. पन्हाळगडावर सिद्दीच्या वेढ्यात छत्रपती शिवाजी महाराज अडकले होते. योजना आखून ते विशाळगडावर सुखरूप पोहोचले. परंतु, या रणसंग्रामात या मार्गावर अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांनी हौतात्म्य पत्करले. पन्हाळगडावर नरवीर शिवा काशीद आणि पावनखिंडीत बाजीप्रभू, फुलाजी प्रभू धारातीर्थी पडले. त्यांच्या या हौतात्म्यास अभिवादन करण्यासाठी आणि या स्फूर्तिदायी घटनेला उजाळा देण्यासाठी हजारो शिवभक्त या मोहिमेत सहभागी होतात.
या आहेत नियोजित तारखा
- मैत्रेय प्रतिष्ठान : १० जुलै साहसरात्र मोहीम (४३ वी मोहीम)
- सह्याद्री प्रतिष्ठान : १२-१३ जुलै (२९ वी मोहीम)-आनंदराव पोवार प्राचीन युद्धकला प्रशिक्षण संस्था : १२-१३ जुलै (४० वी मोहीम)
- कोल्हापूर हायकर्स : १२-१३ जुलै व १६-१७ ऑगस्ट (१३ व १४ वी मोहीम)
- शिवराष्ट्र परिवार महाराष्ट्र : १२-१३-१४ जुलै (३२ वी मोहीम)
- काेल्हापूर मैदानी खेळ : १९-२० जुलै (२७ वी मोहीम)
- निसर्गवेध परिवार : २०-२१ जुलै (२५ वी मोहीम)
- हिल रायडर्स ॲडव्हेंचर फाउंडेशन : २०-२१ जुलै, २७-२८ जुलै (७२ व ७३ वी मोहीम)
पहिली मोहीम १९६७ मध्ये
दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर हे पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड पदभ्रमंतीचे जनक आहेत. त्यांनी त्यांच्या ९१ व्या वर्षी पहिली पदभ्रमंती दिनांक १२ व १३ जुलै १९६७ रोजी पूर्ण केली. ज्या मार्गाने आणि ज्या तिथीस शिवछत्रपती गेले, त्याच मार्गाने व तिथीस, आषाढ वद्य प्रतिपदेस ४० मैल अंतर पार करत त्यांनी ही मोहीम पूर्ण केली. सोबत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे होते. त्यापूर्वी थोर इतिहास संशोधक मु. गो. गुळवणी यांनी हे अंतर पूर्ण केले होते.