९ वर्षांची प्रतिक्षा संपली; कोल्हापुरकरांच्या अभ्यंगस्नानाला थेट पाईपलाईनचे पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2023 00:01 IST2023-11-10T23:58:44+5:302023-11-11T00:01:55+5:30
आमदार सतेज पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नांनी यापुढच्या काळात कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.

९ वर्षांची प्रतिक्षा संपली; कोल्हापुरकरांच्या अभ्यंगस्नानाला थेट पाईपलाईनचे पाणी
दुर्वा दळवी
कोल्हापूर - कोल्हापुरकरांसाठी आजि सोनियाचा दिनु ठरला आहे. दिवाळीच्या अभ्यंगस्नान थेट पाईपलाईनच्या पाण्याने होणार असून पुईखडी प्रकल्पात शुक्रवारी रात्री अकरा वाजता पाणी पोहोचले. यावेळी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. गेल्या ९ वर्षापासून या योजनेसाठी संघर्ष सुरू होता. अखेर आज कोल्हापूरकरांना पाईपलाईनचं पाणी पोहचलं.
आमदार सतेज पाटील यांच्या यशस्वी प्रयत्नांनी यापुढच्या काळात कोल्हापूर शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे. काळम्मावाडी येथून पुईखडी येथे पाणी पाईपालाईननं पोहचले. तेव्हा जलपूजन करण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जयश्री जाधव उपस्थित होते. पूजन झाल्यानंतर यातील पहिले पाणी हे अंबाबाई देवीच्या चरणी अर्पण करण्यात आले.
धरणक्षेत्र ते पुईखडी या मार्गावर १८०० एमएम जाडीची स्पायरल वेल्डेड जलवाहिनी, तर पुईखडी ते कसबा बावडा जलशुद्धीकरणपर्यंत ६०० एमएम जाडीची जलवाहिनी घालण्यात आली आहे. नव्या योजनेत ४० एमएलडी क्षमतेचे दोन जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले असून, जुन्या ६० एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकर केंद्रही कार्यान्वित राहणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.