तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी
By विश्वास पाटील | Published: January 8, 2024 03:12 PM2024-01-08T15:12:24+5:302024-01-08T15:13:03+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली मुंबईत भेट..
![Take Talathi Recruitment Exam from State Public Service Commission Raju Shetty's demand | तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी Take Talathi Recruitment Exam from State Public Service Commission Raju Shetty's demand | तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/ajit-pawar-raju-shetti_2024011153971.jpg)
तलाठी भरती परीक्षा राज्य लोकसेवा आयोगाकडून घ्या; राजू शेट्टी यांची मागणी
कोल्हापूर : राज्य सरकारने सरळसेवा पध्दतीने तलाठी भरती प्रक्रियाच्या परिक्षा घेण्यात आल्या. यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचे सकृत दर्शनी निदर्शनास आले आहे. परिक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना २०० मार्काच्या पेपरला २१४ मार्क पडले असल्याचे प्रकार समोर आल्याने परिक्षा कशा पारदर्शक पध्दतीने झाल्या असतील हे दिसून येते. यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे सोमवारी केली.
गेल्या अनेक वर्षापासून सरळसेवा भरती प्रक्रिया मध्ये ज्या कंपन्यामार्फत पेपर घेतल्या जातात त्या घोटाळा करतातच हे ब-याचवेळेस सिध्द झाले आहे. यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येवून शासनास परिक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आतासुध्दा तलाठी भरती प्रक्रियेत मोठा घोटाळा झालेला असून यामुळे हुशार, होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणणे असेल तर या निकालपत्रातील २०० पैकी १२५ पेक्षा जादा गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांची एमपीएससी परिक्षा घेऊन पात्रता सिध्द करण्यास संधी द्यावी. जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उतीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरळसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.