जनतेचंच ठरलंय ‘शेट्टी-महाडिक’: प्रकाश आवाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 01:02 AM2019-04-15T01:02:57+5:302019-04-15T01:03:02+5:30
कोल्हापूर : नाराज असणाऱ्यांचं ‘ठरलंय,’ तुम्हीही ‘ध्यानात ठेवलंय;’ पण कोल्हापूरच्या जनतेचंसुद्धा ठरलंय, राजू शेट्टी व धनंजय महाडिक यांना खासदार ...
!['Shetty-Mahadik': Prakash Awade | जनतेचंच ठरलंय ‘शेट्टी-महाडिक’: प्रकाश आवाडे 'Shetty-Mahadik': Prakash Awade | जनतेचंच ठरलंय ‘शेट्टी-महाडिक’: प्रकाश आवाडे](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/14kol-aawade_201904222240.jpg)
जनतेचंच ठरलंय ‘शेट्टी-महाडिक’: प्रकाश आवाडे
कोल्हापूर : नाराज असणाऱ्यांचं ‘ठरलंय,’ तुम्हीही ‘ध्यानात ठेवलंय;’ पण कोल्हापूरच्या जनतेचंसुद्धा ठरलंय, राजू शेट्टी व धनंजय महाडिक यांना खासदार करायचे; त्यामुळे काळजी करू नका, अशी ग्वाही देत, पक्षानेही लक्षात ठेवलंय, कोण पक्षाचे काम करतो, याचा अहवाल राष्ट्रीय सचिवांकडे आहे. तो योग्य ठिकाणी पोहोचेल, असा इशारा कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी दिला.
राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गांधी मैदानातील सभेच्या तयारीसाठी रविवारी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, ‘राफेल’च्या व्यवहारात अनिल अंबानी यांना फ्रान्स सरकारने ११२५ कोटींची करसवलत दिल्याचे नुसते जाहीर झाले आणि लगेच कॉँग्रेसचे राष्टÑीय प्रवक्ते रत्नदीप सूरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. देशात कॉँग्रेसचे नेते फारच आक्रमक आहेत; पण राज्य व जिल्ह्यातील कॉँग्रेस नेत्यांना काय झाले? हे नेते ढेपाळले आहेत. आमचं ठरलंय, दुसरीकडे विनय कोरे यांचे तसे. उरलेली कॉँग्रेस तरी कामाला लावा, असे आवाहन मुश्रीफ यांनी केले.
यावर प्रकाश आवाडे म्हणाले, कॉँग्रेसचे राष्टÑीय सचिव बाजीराव खाडे या बैठकीस आले आहेत. यापुढे पक्षाबरोबर काम करील त्यालाच प्रतिष्ठा मिळेल. पदाधिकाऱ्यांचा तालुकानिहाय आढावा त्यांनी घेतला आहे. त्याचा अहवाल योग्य ठिकाणी पोहोचेल आणि त्याची नोंदही होईल. यावेळी खासदार धनंजय महाडिक, ए. वाय. पाटील, भरमूअण्णा पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री करा, २५ हजार माणसं आणतो
गांधी मैदानातील सभेला पाच हजार माणसं आणतो, असे मुश्रीफ यांनी सांगितले. हाच धागा पकडत के. पी. पाटील म्हणाले, कागलच्या सभेत पवारसाहेबांनी मुश्रीफ यांना पुढचे मंत्रिपदही जाहीर करून टाकल्याने नुसती पाच हजार माणसं, हे तुम्हाला शोभत नाही. मंत्रिपदाबाबत माझ्या नावाची घोषणा केली असती तर मी २५ हजार आणली असती.
राष्टÑवादीच्या स्थापनेपासून कागल ही आमची राखीव फौज आहे, ती कायम तयार असते. त्यात ‘आला रे आला, वाघ आला...’ हे म्हणायलाच पाहिजे; त्यामुळे तुम्ही २५ हजार माणसे आणाच, असा चिमटा पाटील यांनी काढला.
होळीदेवीची पोळी कागलकडेच
शरद पवार यांची सभा गारगोटी येथे होणार म्हणून आम्ही खूश होतो; पण ती सभा कागलला घेतली. होळीदेवाची पोळी कायम कागलकडेच पडते, अशी मिश्कील टिप्पणी के. पी. पाटील यांनी केली.