भुईमूग बियाणांची टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:17 IST2021-01-08T05:17:34+5:302021-01-08T05:17:34+5:30
कोपार्डे : उन्हाळी भुईमूग करण्याकडे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. पण यावर्षी रब्बी हंगामातच भुईमूगाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची गडबड ...

भुईमूग बियाणांची टंचाई
कोपार्डे : उन्हाळी भुईमूग करण्याकडे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा कल असतो. पण यावर्षी रब्बी हंगामातच भुईमूगाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांची गडबड उडाली असून भुईमूगाच्या बियाणांच्या टंचाईबरोबर दरात मोठी वाढ झाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात रब्बी हंगामात ऊसाच्या क्षेत्रात मका, ज्वारी ही पिके आंतरपिके म्हणून शेतकरी उत्पादन घेतात. दूध उत्पादन वाढीला मका व ज्वारीच्या ओल्या चाऱ्याचा उपयोग होत असल्याने या पिकांना शेतकरी प्राधान्यक्रम देत होते. पण गेल्या दोन वर्षांत मका व ज्वारीच्या पिकावर लष्करी आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत आहे. याही वर्षी लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसू लागल्याने आणि खाद्यतेलाचे दर भडकल्याने शेतकऱ्यांनी पूर्व हंगामी ऊसाच्या लागणीबरोबर यावर्षी माड्या रानातही भुईमूग पीक घेण्यासाठी गडबड सुरू केली आहे. सध्या भुईमूग पेरणीसाठी पेरणी हंगाम आल्याने आणि लवकर पक्व होणाऱ्या जातीबरोबर जादा तेल उत्पादन देणाऱ्या भुईमूगाच्या जातीची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांचा कल आहे. पावसाळ्यात येणाऱ्या जाती शक्यतो उन्हाळी हंगामात उगवण व उत्पादन चांगले देत नसल्याने बाजारातील चांगल्या बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाणे खरेदीसाठी पसंती देत आहेत. पण भुईमूग बियाणे टंचाईबरोबर १०० ते १२० रुपये प्रति किलो बियाणाचा असणारा दर १६० ते १७५ रुपये किलोवर पोहोचल्याने शेतकरी हतबल झाला आहे. एक तर बियाणे मिळेना आणि मिळाले तर वाढीव दराने खरेदी करावे लागत आहे.
जिल्ह्यात सूर्यफुलाकडे चांगले उत्पादन व दर्जेदार तेलाचा उत्पादकता असल्याने शेतकरी पसंती देत होते. पण गेल्या दोन वर्षांत बोगस बियाणे व सूर्यफुल भरत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता.
प्रतिक्रिया
बहुतांश शेतकरी भुईमूगाचे घरगुती बियाणे वापरतात. केवळ २० टक्के बियाणे कंपनीचे वापरले जाते. भुईमूग हे उन्हाळी पीक आहे. याचा रब्बी मध्ये समावेश होत नाही.
- ज्ञानेश्वर वाकुरे (जिल्हा कृषी अधिकारी)