महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 14:31 IST2025-08-03T14:30:02+5:302025-08-03T14:31:16+5:30
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनी 'महादेवी हत्तीसाठी' नांदणी ते कोल्हापूर पर्यंत आत्मक्लेष पदयात्रेला सुरूवात केली आहे.

महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. आज रविवारी पहाटे नांदणीपासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत आत्मक्लेष पदयात्रा सुरू झाली आहे. ही पदयात्रा स्वाभीमानीचे राजू शेट्टी यांच्या नेतृ्त्वात सुरू आहे. या पदयात्रेला सामान्य जनता, सर्वपक्षीय नेत्यांनी प्रतिसाद दिला आहे.
नांदणी जैन मठ आणि त्याचबरोबर महादेवी हत्तीवर प्रेम करणारे विविध माध्यमातून चळवळ उभी करत आहेत. ती हत्ती परत मठात येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत.आज पहाटे चार वाजता नांदणी येथून पदयात्रेला सुरूवात झाली. या पदयात्रेत अनेकांनी सहभाग घेतला आहे.
कोल्हापुरात वनतारा विरोधात मोठी मोहिम सुरू झाली आहे. या मोहिमेची दखल घेत वनताराचे पथक कोल्हापूरात आले होते. त्यांनी मठातील स्वामींची भेट घेतली.
राजू शेट्टींचा गंभीर आरोप
दरम्यान, यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी गंभीर आरोप केला. पेटा संघटनेच्या तक्रारीवरून महादेवी हत्तीला गुजरातच्या वनताराला पाठवण्यात आले आहे. हा सर्व षडयंत्राचा भाग होता, असा गंभीर आरोप केला. त्यासाठी आत्मक्लेष पदयात्रा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार असल्याचे शेट्टी म्हणाले.
"जैन समाजाची परंपरा व प्रतिष्ठा खंड पाडण्याचा डाव या मंडळीनी रचला गेला. संस्कृती, इतिहास, परंपरा, वारसा या सगळ्या गोष्टी समाज म्हणून गेल्या १२०० वर्षापासून नांदणी मठाकडून जपल्या जात आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कमलापूर येथे शासनाचे हत्ती संगोपन केंद्र आहे. शिवाय कर्नाटक,केरळ येथेही हत्ती पुनर्वसन केंद्र असताना तो नेमका ‘वनतारा’कडे सुपूर्द करण्यास सांगितले जाण्याचे कारण काय?", असा सवालही शेट्टी यांनी केला.