‘राधानगरी’ने गाठला तळ !
By Admin | Updated: July 9, 2014 01:03 IST2014-07-09T00:49:19+5:302014-07-09T01:03:18+5:30
१.९० टीएमसी पाणीसाठा : वीजनिर्मिती बंद

‘राधानगरी’ने गाठला तळ !
राधानगरी : राधानगरी धरण परिसरात गतवर्षीच्या तुलनेत आज, मंगळवारपर्यंत तब्बल १२०७ मि.मी. कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही ३.२५ टीएमसी इतका कमी असून, तो केवळ १.९० टीएमसी आहे. पाण्याची पातळी २९१.८० फुटांवर आहे. ३४७.५० फुटांवर धरण पूर्ण भरते.
जुलै महिना सुरू झाला, की सर्वांचे लक्ष या धरणाचे वैशिष्ट्य असलेले स्वयंचलित दरवाजे केव्हा सुरू होतात याकडे असते. गतवर्षी २३ जुलैला धरण पूर्ण भरून ३ व ६ क्रमांकांचे दरवाजे उघडले होते.गतवर्षी दि. ८ जुलैला ६० मि.मी., तर एकूण १६९३ मि.मी. पाऊस झाला होता. धरणावरील महाजनको व खासगी जलविद्युत निर्मिती केंद्रातून दोन टीएमसीपेक्षा जास्त पाणी सोडूनही ५.१६ टीएमसी पाणी धरणात शिल्लक होते. यावर्षीही आज सकाळी ५० व एकूण ४८६ मि.मी. पाऊस झाला असून १.९० टीएमसी पाणीसाठा आहे. आजच्या पाणी पातळीचा विचार करता धरण भरायला अजून ५५.७० फूट पाणी कमी आहे. त्यामुळे महाजनकोच्या केंद्रातून सुरू असलेली वीजनिर्मिती आजपासून बंद केली आहे.