कोल्हापुरात दोन हजार विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीतमय कवयत, अंबाबाईचा जागर, मान्यवरांचा सत्कार
By संदीप आडनाईक | Updated: January 26, 2026 14:48 IST2026-01-26T14:48:07+5:302026-01-26T14:48:43+5:30
मुख्य शासकीय सोहळ्यात ७७ वा प्रजासत्ताक दिन

कोल्हापुरात दोन हजार विद्यार्थ्यांची देशभक्तीपर संगीतमय कवयत, अंबाबाईचा जागर, मान्यवरांचा सत्कार
संदीप आडनाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर : ७६ वर्षांपूर्वी, १९५० मध्ये आपण केवळ एक स्वतंत्र राष्ट्र नव्हतो, तर आपण एक 'लोकशाही प्रजासत्ताक' म्हणून जगाच्या नकाशावर उभे राहिलो. 'प्रजासत्ताक' म्हणजे जिथे प्रजेची, म्हणजेच सामान्य माणसाची सत्ता असते. अशा प्रत्येक सामान्य माणसाचा जगण्याचा आधार आपले संविधानच आहे, असे गौरवोद्गार आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी काढले. त्यांच्या हस्ते कोल्हापूरमधील मुख्य प्रजासत्ताक दिनाचा समारंभ पोलीस परेड क्रिडांगणावर पार पडला. यावेळी त्यांनी देश, स्वातंत्र्य, लोकशाही आणि संविधान याबाबत योगदान दिलेल्या महापुरुषांच्या कार्याचा गौरव करीत आदरांजली वाहिली. समारंभ प्रसंगी प्रथम संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
यावेळी खासदार शाहू छत्रपती, जैन अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललीत गांधी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र सुनिल फुलारी, जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर मनपा आयुक्त के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय, आणीबाणीतील सहभागी, नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित जेष्ठ नागरिकांना पुष्प देऊन पालकमंत्री आबिटकर यांनी त्यांचे स्वागत केले.
पहिल्यांदाच पोलीस परेड येथील भव्य क्रीडांगणावर हजारो नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. आबिटकर यांच्याहस्ते राष्ट्रध्वजवंदन झाल्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीत गायले गेले. पालकमंत्र्यांनी परेड कमांडर आरांक्षा यादव परिविक्षाधीन भापोसे यांच्यासोबत परेड निरीक्षण झाल्यानंतर विविध विभागांच्या पथकांनी संचलन केले. तसेच यावेळी प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विविध मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. उषाराजे हास्कुलच्या विद्यार्थ्यांनी अंबाबाईचा जागर गीत सादर केले. यावेळी विविध शाळेतील दोन हजार विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीतमय कवयतीमधून उपस्थितांमध्ये राष्ट्रभावना जागृत केली. या समारंभात पालकमंत्री आबिटकर यांनी शुभेच्छा संदेश दिला.
यांचा झाला गौरव
राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शंकर शिंदे तसेच जिल्ह्यातून विक्रमी रुपये २ कोटी २४ लाख ९९ हजार सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, सहायक जिल्हा सैनिक अधिकारी सुभाष डोंगरे यांचा सत्कार करण्यात आला. भारत मंडपम्, नवी दिल्ली येथे राष्ट्रीय लोकगीत स्पर्धेत महाराष्ट्राने सादर केलेल्या डॉ. आझाद नायकवडी यांचे दिग्दर्शनाखालील आई अंबाबाईच्या गोंधळाला संपूर्ण भारतात तृतीय क्रमांक मिळाला. यातील विजेते श्रद्धा तानाजी जाधव, जान्हवी सागर कांबळे, अनुष्का प्रकाश शिंदे, रुद्राक्षी प्रसाद हिरेमठ, पायल विशांत खोचीकर, कल्याणी दत्तात्रय चव्हाण, लावण्या रविंद्र चव्हाण, श्रेयश प्रवीण जाधव, रामदास देसाई, ओम प्रसाद तारे व सानिका धोंड यांचा सत्कार करण्यात आला. कागल येथील गहिनीनाथ हजरत गैबीपीर उरुस यात्रेत आकाश पाळण्यात अडकलेल्या १८ नागरिकांना सुरक्षित सुटका केल्याबद्दल स्थानक अधिकारी जयवंत मल्हारी खोत, ओमकार श्रीनिवास खेडकर, वाहनचालक अमोल विश्वास शिंदे, फायरमन प्रमोद प्रभाकर मोरे व अभय रावसाहेब कोळी यांचा सत्कार करण्यात आला. आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर, कार्यक्रम समन्वय प्रज्ञा संकपाळ, एनटीपीसीचे जिल्हा सल्लागार विक्रम आरळेकर यांचा सत्कार करण्यात आला. प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेअंतर्गत उत्कृष्ट कार्याबद्दल उपविभागीय कृषी अधिकारी गडहिंग्लज किरण जयसिंग पाटील, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज रघुनाथ पाटील, जिल्हा संसाधन व्यक्ती अभिजीत बाबासो धनवडे, बँक ऑफ इंडिया जिल्हा प्रबंधक पुनित द्विवेदी यांचा सत्कार करण्यात आला. संजय सोनार आणि विद्या पाटील यांनी सूत्रसंचालन केले. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी आभार मानले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजवंदन
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. सुरुवातीला संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये ध्वजवंदन
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये राधानगरी-कागल उपविभागीय अधिकारी प्रसाद चौगुले यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यानंतर महाराष्ट्र गीत व भारताच्या संविधानाचे प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.
याप्रसंगी औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश विजय आदोने, अविनाश मालुंजकर, माहिती उपसंचालक प्रवीण टाके, कामगार न्यायालयाच्या क्र. एक च्या न्यायाधीश मधुरा मुळीक, कै. बी. कामगौडा, राज्य गुप्तवार्ती विभागाचे अप्पर उपायुक्त शशिराज पाटोळे, सहा.आयुक्त संजय डोर, सचिन पाटील उपस्थित होते.
कोल्हापूर सर्किट बेंच येथे राष्ट्रध्वजवंदन
मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच येथे प्रमुख न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी न्यायमूर्ती एन बी सूर्यवंशी , न्यायमूर्ती अजित कडेठाणकर, न्यायमूर्ती वृषाली जोशी यांची उपस्थिती होती. प्रारंभी पोलीस विभागाने मानवंदना दिली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, मनपा आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी, पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश, इतर न्यायाधीश, जेष्ठ विधीज्ञ यांच्यासह सर्किट बेंचचे इतर कार्यालयीन अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.