कळंबा : प्रशासनाकडून कचऱ्याचा वेळेत उठाव झाला नाही तर रस्त्यालाच कसे कचऱ्याचे स्वरुप येते याचा प्रत्यय कळंबा येथील साई मंदिर ते आपटेनगर नवीननाका या वर्दळीच्या मुख्य रस्त्यालगत येतो. येथील ओढ्यानजीक बसवण्यात आलेल्या कोंडाळ्यातूनन अक्षरशः कचरा रस्त्यावर पसरला असतानाही प्रशासनाकडून तो उचलला जात नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. येथील कचऱ्याचा वेळीच उठाव न केल्यास सुर्वेनगर विकास समितीच्यावतीने नागरिक आंदोलनाचे हत्यार उपसण्याची शक्यता आहे. कोंडाळामुक्त कोल्हापूर, आपला प्रभाग स्वच्छ प्रभाग, या प्रशानाच्या भूमिकेस रस्त्यावरच्या पसरलेल्या कचऱ्यामुळे हरताळ फासला जात आहे. या कोंडाळ्यालगत ज्येष्ठ नागरिकांसाठी ओपन जीम उभारण्यात आली असून नागरिकांना कचऱ्याची दुर्गंधी सहन करावी लागत आहे. परिसरातील हॉटेल्स, नागरी वस्त्यांमधील नागरिक चिकन विक्रेते कचरा कोंडाळ्यात न टाकता उघड्यावर टाकत आहेत. यात प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे हा कचरा रस्त्यावर विखुरला जात आहे. त्यामुळे प्रशासनाने या कचर्याचा वेळीच उठाव करण्याची मागणी होत आहे.
फोटो ३० कळंबा कचरा
ओळ
साईमंदिर कळंबा ते नवीन वाशीनाका चौक या वर्दळीच्या रस्त्यावरील ओढ्यालगत कचरा कोंडाळ्यातील कचरा रस्त्यावर पसरला आहे.