कोल्हापूर--सिग्नल लागले; टायमिंग जुळेना!

By Admin | Updated: July 30, 2014 00:32 IST2014-07-29T23:32:33+5:302014-07-30T00:32:09+5:30

वाहतुकीचा तिढा कायम : सुव्यवस्था लागण्यासाठी आणखी तीन-चार महिन्यांचा अवधी लागणार

Kolhapur - signal started; Timing! | कोल्हापूर--सिग्नल लागले; टायमिंग जुळेना!

कोल्हापूर--सिग्नल लागले; टायमिंग जुळेना!

पुणे-मुंबई-नाशिकनंतर नागरिकीकरणाच्या स्पर्धेत असणाऱ्या कोल्हापूर शहरात लोक संख्येबरोबरच वाहनेही दरवर्षी हजारोंच्या पटीत वाढत आहेत. असे असताना शहरात सार्वजनिक वाहतूक सुविधा मात्र दिवसेंदिवस बिघडत असल्याचे चित्र ‘लोकमत’ने जानेवारी महिन्यात ‘आता बस्स!’ या मालिके द्वारे मांडले. ‘लोकमत’ने घेतलेल्या सततच्या पाठपुराव्यामुळे शहरात १९ ठिकाणी सिग्नलचे दिवे लागले अन् वाहतुकीचा तिढा सुसह्य झाला असला तरी अद्याप म्हणावी तशी वाहतुकीला शिस्त आलेली नाही. सिग्नलचे टायमिंग अद्याप जुळलेले नाही तर पार्किंगचा प्रश्न आजही आवासून उभा आहे.

संतोष पाटील - कोल्हापूर
शहरातील वाहतुकीचा बोजवारा उडाला असताना सिग्नलसाठीचे दीड कोटी रुपये सहा महिने पालिकेच्या तिजोरीत पडून होते. ‘बीओटी’वरील सिग्नलही रखडलेले. जानेवारी महिन्यात ‘लोकमत’ने दणका देताच महापालिकेसह पोलीस प्रशासन खडबडून जागे झाले.
निविदा प्रक्रिया राबवून संबंधित कंपनीला तत्काळ वर्कआॅर्डरही देण्यात आल्या. सहा महिन्यांत स्वनिधीतून १४, तर ‘बीओटी’वरील पाच सिग्नल सुरू झाले. येत्या दोन आठवड्यांत आणखी तीन सिग्नल सुरू होणार असल्याची माहिती शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक आर. आर. पाटील यांनी दिली. सिग्नल सुरू होण्यासाठी ‘लोकमत’ची ‘आता बस्स!’ ही मालिका कारणीभूत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.
महापालिकेला रस्ते विकास निधीमधून ३० लाख व गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विशेष निधीतून एक कोटी २० लाख, असा दीड कोटींचा निधी सिग्नलसाठी मिळाला. प्रशासन व प्रतिनिधींची उदासीनता व ‘पाकीट संस्कृती’मुळे गेली दीड वर्षे सिग्नलचा दिवा सुरू झालाच नाही. निविदा प्रक्रियेतच प्रशासन अडकले होते. शहर विकास आराखड्यानुसार शहरातील प्रमुख रस्त्यांची लांबी एक लाख २९ हजार ९६४ मीटर असून, त्यांना जोडणारे ३२४ चौक आहेत. दररोज किमान चार लाखांहून अधिक वाहने शहरातील रस्त्यांवरून धावतात. वाहतूक शिस्तीसाठी पायाभूत प्रमाण असणारे ट्रॅफिक सिग्नल मात्र दोनच होते. बोजवारा उडालेल्या शहरातील वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी अभ्यासपूर्ण नियोजन करण्याची गरज निर्माण झाली होती. शहरातील पार्किंगसह सिग्नलची गरज ‘लोकमत’ने ‘आता बस्स!’ मालिकेद्वारे मांडली.
शहरातील ३१४ लहान-मोठ्या चौकांपैकी आजच्या घडीला २८ चौकांत सिग्नल बसविणे आवश्यक होते. यापैकी १९ चौकांत सिग्नल बसले आहेत. पूर्वी केवळ दोनच सिग्नल सुरू होते. आता २२ पैकी तीन ठिकाणीच सिग्नल बसविणे बाकी आहे. शहरात सिग्नल लागले. मात्र, वाहतुकीचा तिढा कायम आहे. सिग्नलच्या वेळात फरक पडत असल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. या साऱ्या सिग्नलचे टायमिंग जुळण्यासाठी शहर वाहतूक शाखेने मार्ग काढण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.

२००४ सालच्या शहराच्या हवेतील ‘एसओ-टू’चे ४.९८ टक्के प्रमाण २०१३ मध्ये २२.८१ टक्के झाले आहे. ‘एनओएक्स’चे प्रमाण ११.५२ वरून ३६.०५ झाले. श्वसनास घातक ठरणारे कणांचे (आरएसपीएम) प्रमाण ७०.५६ वरून ३४३.७५ वर गेले आहे. हवेतील धूलिक ण (एसपीएम) १५८.५८ वरून २८४ .१४ वर पोहोचल्याची आकडेवारी सांगते. सहा ते सात वर्षांपूर्वी शहरातील गोंगाट सरासरी ६५ ते ७० डेसीबल होता. यामध्ये सरासरी २० डेसीबल इतकी वाढ झाली आहे. शहरातील एकूण हवेपैकी ४० टक्के हवा दूषित असल्याचे अहवाल सांगतो. शहरातील रेंगाळणारी वाहतूक या सर्व घटकास प्रमुख जबाबदार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यामुळे शिस्तबद्ध वाहतूक हे शहराच्या सामाजिक व आरोग्यपूर्ण स्वास्थ्यासाठी गरजेचे आहे.
सिग्नल नसल्याने दुष्परिणाम
कमी धूर व कमी आवाजासाठी वाहन चालविताना सतत एक गती आवश्यक असते. बेशिस्त वाहतुकीमुळे वेग मंदावतो. बेशिस्तीला सिग्नलमुळे लगाम बसतो. गर्दीच्या चौकात सिग्नल सुरू असताना अनेक वाहने न्यूट्रल केली जातात. मात्र, सिग्नल नसलेल्या ठिकाणी गर्दीतून पुढे जाण्याच्या स्पर्धेत वाहन वरच्या पातळीवर सुरू राहते. यावेळी मोठ्या प्रमाणात हॉर्न वाजविला जातो. परिणामी, अशा परिस्थितीत धुराबरोबर ध्वनी प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. नवी दिल्लीसारख्या शहरात शिस्तबद्ध वाहतूक व ‘सीएनजी’मुळे ४५ अंशांच्या तापमानातही श्वसन अथवा त्वचेला इजा पोहोचत नाही. शिस्तबद्ध वाहतूक ही शहराच्या पर्यावरणात भरच घालत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

सहा महिन्यांत येथे लागले सिग्नल
४कोंडा ओळ चौक४फोर्ड कॉर्नर ४उमा टॉकीज चौक ४पार्वती टॉकीज ४ सीपीआर चौक ४लिशा हॉटेल ४ताराराणी चौक ४ संभाजीनगर चौक ४रिंग रोड ४पंचशील हॉटेल चौक ४दाभोळकर कॉर्नर ४व्हीनस चौक ४मलबार हॉटेल चौक ४सायबर चौक ४आदी १४ ठिकाणी सिग्नल सुरू झाले. टाकाळा, गोखले कॉलेज, जनता बझार चौक या तीन ठिकाणी येत्या दोन आठवड्यांत सिग्नल सुरू होणार आहेत.


सिग्नलची गरज असणारे चौक
-रंकाळा चौक ४बीएसएनएल टॉवर
- असेंब्ली रोड कॉर्नर ४क्रशर चौक ४यल्लम्मा मंदिर चौक ४ ध्यानचंद हॉकी मैदान चौक ४कसबा बावडा भगवा चौक आदी चौकांत वाहनधारकांकडून सिग्नलची मागणी होत आहे.

‘बीओटी’वर येथे लागले सिग्नल
निधीची उपलब्धता नव्हती, त्यावेळी महापालिकेने माळकर चौक, गंगावेश चौक, शहाजी लॉ कॉलेज, ट्रेझरी चौक, उद्यम चौक, आदी पाच ठिकाणी ‘बीओटी’ तत्त्वावर सिग्नल उभारणी केली. संबंधित कंपनीने चौकात जाहिराती करून पैशाची परतफेड करण्याची, अशी ही योजना लालफितीच्या कारभारात दोन वर्षे पडून होती. मात्र, ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे महिनाभरात सर्व्हे होऊन सिग्नलचे खांबही लावले.

ताराराणी चौकातील आव्हान
कोल्हापुरातील ताराराणी पुतळा चौकात नेहमीच वाहतुकीची कोंडी होत होती. शहराच्या प्रवेशद्वारातूनच वाहनधारकांचा अडखळत प्रवास सुरू होता. चार दिशेहून शहरात येणाऱ्या व शहराबाहेर जाणाऱ्या या चौकात सिग्नल बसवून वाहने पास होण्याच्या वेळा निश्चित करणे, हे मोठे आव्हान होते. पोलीस प्रशासनाने सातत्याने दिवसाच्या वेगवेगळ्या वेळेच्या वाहतुकीच्या स्थितीचा अभ्यास करून पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी त्या वेळा निश्चित केल्या.

समाजस्वास्थ्यासाठी वाहतूक शिस्त
प्रमोद माने (उपप्रादेशिक अधिकारी-एमपीसीबी)
वाहतुकीच्या
शिस्तीला प्राधान्य
मुंबईतील वाहतूकतज्ज्ञ श्रीधर सारंग यांचे शिबिर घेऊन शहर वाहतूक शाखेतील १०८ पोलिसांना वाहतूक शिस्तीचे धडे दिले आहेत. हातवारे करून वाहतुकीला शिस्त लावण्याची पद्धती क ालबाह्य झाली आहे, तरीही बॅटल सिग्नलच्या साहाय्याने वाहतुकीला शिस्त लावण्याचा प्रयत्न सिग्नल नसलेल्या चौकात पोलीस कर्मचाऱ्यांकडून केला जातो. वाहतूक शिस्त ही फक्त पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून, यासाठी पायाभूत सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. वाहतुकीस शिस्त लावण्यात काही त्रुटी असल्यास यामध्ये सकारात्मक बदल करण्यात येतील. आणखी आठ ते दहा चौकांत सिग्नल बसविण्यात येणार आहेत. यासाठी तातडीने निधी देवू.
- सतेज पाटील, गृहराज्यमंत्री

Web Title: Kolhapur - signal started; Timing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.