Kolhapur North By Election: १९ उमेदवारांचे २७ अर्ज, 'आप'ची लढण्यापूर्वीच माघार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:04 IST2022-03-25T12:00:23+5:302022-03-25T12:04:12+5:30
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ जणांनी १६ उमेदवारी अर्ज सादर केले. यात अपक्षांची संख्या जास्त आहे. आजवर १९ उमेदवारांनी २७ अर्ज भरले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी सुरू होणार आहे.

Kolhapur North By Election: १९ उमेदवारांचे २७ अर्ज, 'आप'ची लढण्यापूर्वीच माघार
कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ जणांनी १६ उमेदवारी अर्ज सादर केले. यात अपक्षांची संख्या जास्त आहे. आजवर १९ उमेदवारांनी २७ अर्ज भरले आहेत. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून अर्जांची छाननी सुरू होणार आहे.
दरम्यान, उमेदवारांच्या खर्चावर देखरेख करण्यासाठी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमधील अधिकारी रविकांत चौधरी हे कोल्हापुरात दाखल झाले आहेत. अर्ज माघारीची मुदत २८ मार्चपर्यंत असून, १२ एप्रिलला मतदान व १६ एप्रिलला मतमोजणी आहे.
कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीत गुरुवारी जयश्री जाधव, सचिन प्रल्हाद चव्हाण यांनी काँग्रेसकडून, सत्यजित शिवाजीराव कदम यांनी भारतीय जनता पक्षाच्यावतीने तर बाजीराव सदाशिव नाईक, करुणा धनंजय मुंडे, संजय भिकारी मागाडे, अरविंद भिवा माने, भारत संभाजी भोसले,मुस्ताक अजिज मुल्ला, सुभाष जैनू देसाई, अस्लम बादशाजी सय्यद, मनिषा मनोहर कारंडे, राजेश सदाशिव कांबळे यांनी अपक्ष, शाहीद शहाजान शेख यांनी वंचित बहुजन आघाडीकडून अर्ज भरले.
अखेरच्या दिवशी अपक्षांनीच मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज सादर केले. आज शुक्रवारी सकाळी ११ वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात येणार आहे.
वेळ संपल्यानंतर विनंती
उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी सकाळी अकरा ते दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ देण्यात आली होती; पण काही उमेदवार वेळ निघून गेल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आले. काही जण अन्य जिल्ह्यातील होते.. पण वेळ संपल्याने प्रशासनाने अर्ज स्वीकारण्यास नकार दिला. सुुरुवातीला विनंती आणि नंतर वादावादीचा प्रसंग आला; पण प्रशासनाने निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार वेळ संपल्यावर अर्ज घेता येणार नाही, असे सांगितल्यावर ते निघून गेले.
आप लढण्यापूर्वीच माघार..
पंजाबमधील दणदणीत यशानंतर आम आदमी पक्षानेही कोल्हापूर उत्तरची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता; परंतु देशातील कोणत्याच राज्यातील पोटनिवडणूक लढवायची नाही, असा राष्ट्रीय पातळीवर धोरणात्मक निर्णय झाल्याने आप ही निवडणूक लढवणार नाही, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले.