कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत फायदा उचलण्यासाठीच आठ गावांना घेऊन हद्दवाढीची प्रक्रिया सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी सांगितले आहे, असा आरोप करीत २० गावांतील सरपंचांनी कोणत्याही परिस्थितीत एक इंचही हद्दवाढ होऊ देणार नाही, असा निर्धार गुरुवारच्या बैठकीत केला.यावेळी तोडा आणि फोडा असे धोरण अवलंबून आधी आठ गावे, नंतर वीस, ४२ गावे घेतली जातील. म्हणून आठ गावच्या हद्दवाढीविरोधातही २० गावांतील सरपंच तीव्र संघर्ष करतील, असा इशारा दिला. सर्वपक्षीय कोल्हापूर महापालिका हद्दवाढ विरोधी समितीतर्फे येथे हॉटेलमध्ये बैठक झाली. समितीचे अध्यक्ष उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण अध्यक्षस्थानी होते.चव्हाण म्हणाले, हद्दवाढीचा विषय कृती समितीमधील आठ ते दहा लोकांनी सध्या ऐरणीवर आणला आहे. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. शहरातील पाणी, कचऱ्याची समस्या गंभीर आहे. अनेक भागात ड्रेनेज नाहीत. शाळेत असल्यापासून अंबाबाई तीर्थ क्षेत्रातून विकास होणार असे नुसतेच ऐकतो आहे. पण अजूनही काहीही झालेले नाही. पंचगंगा नदी गटारगंगा बनली आहे. शहरातील लोकप्रतिनिधी तीन वेळा आमदार झाले. त्यांना शहराचा विकास करता आलेला नाही. भाजपचे सहपालकमंत्री यांनी कोल्हापुरात आल्यानंतर पुण्याच्या हद्दवाढीनंतर समावेशीत गावांचा विकास झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे.
वाचा- हद्दवाढीची चर्चा नुसतीच, हालचाल नाही कसलीच; मुख्यमंत्र्यांकडून तोंडी, लेखी सूचना नाहीतरीही हद्दवाढ लादल्यास संघर्ष करू गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे म्हणाले, शहरातील मूलभूत प्रश्न सोडवण्यात महापालिका यशस्वी झालेली नाही. लोकप्रतिनिधी कोटींचा निधी आणल्याचे सांगतात. पण प्रत्यक्षात काम दिसत नाही. गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, भाग्यश्री पारके, तानाजी पाटील यांची भाषणे झाली. किरण आडसूळ यांनी प्रस्ताविक केले.बैठकीस बालिंगा सरपंच राखी भवड, पाचगाव सरपंच प्रियंका पाटील, नागदेवाडी सरपंच अमृता पोवार, वळीवडे सरपंच रूपाली कुसाळे, सरनोबतवाडीच्या शुभांगी आडसूळ, नागाव सरपंच विमल शिंदे, कळंबा सरपंच सुमन गुरव, मोरेवाडी सरपंच ए. व्ही. कांबळे, कंदलगावचे सरपंच राहुल पाटील, पाडळीचे सरपंच तानाजी पालकर, आंबेवाडीचे सरपंच मारुती पाटील, वाडीपीरच्या सरपंच अनिता खोत, संदीप दरेकर उपस्थित होते.
माझा जन्म शिवाजी पेठेतला..गडमुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगांवे यांनी शहरातील विकासकामे, महापालिकेचा कारभाराचे वाभाडेच काढले. त्या म्हणाल्या, माझा जन्म शिवाजी पेठेतील आहे. शहरापेक्षा चांगला विकास २० गावांत झाला आहे. महापालिका सेवा, सुविधा देऊ शकत नाही. वरिष्ठ अधिकारी आल्यानंतर महापालिकेस आपल्या इमारतीमधील स्वच्छतागृहास कुलूप लावून ठेवावे लागते, इतकी वाईट अवस्था आहे. यामुळे हद्दवाढीचा बालहट्ट कोणीही करू नये.
क्षीरसागर यांचा स्वार्थउजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडेकर म्हणाले, हद्दवाढीला आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके यांचा विरोध आहे. वीस गावांसोबत हे दोन्ही लोकप्रतिनिधी आहेत. मात्र शहराचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा अधिक स्वार्थ असल्याने हद्दवाढ लादत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन हद्दवाढ झाली पाहिजे, असे एका बाजूला ते म्हणतात आणि दुसऱ्या बाजूूला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आठ गावांना घेऊन हद्दवाढ करा, असा आग्रह धरतात. ही त्यांची दुटप्पी भूमिका आहे. ते तीन वेळा आमदार होऊन शहराचा विकास करू शकलेले नाहीत याचे उत्तर द्यावे.
राजकीय जीवनात कोणताही व्यक्तिगत स्वार्थ न पाहता शहराच्या आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करीत आहे. हद्दवाढीमुळे इतर शहरांचा झालेला विकास पाहता कोल्हापूर मागे पडल्याचे दिसत आहे. म्हणून ग्रामीण भागातील नागरिकांना विश्वासात घेऊनच हद्दवाढ होईल. जिल्ह्याचा पर्यायाने शहराच्या विकासाची गरज ओळखून हद्दवाढीसाठी सर्वांनी सकारात्मक भूमिका घ्यावी. - राजेश क्षीरसागर, आमदार, कोल्हापूर उत्तर