ज्येष्ठ नागरीक, लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद; के.एम.टी. ची बससेवा टप्याटप्याने सुरु
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 17:22 IST2020-05-31T17:18:14+5:302020-05-31T17:22:06+5:30
बसमधून ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद करणेत आला आहे. सर्व चालकवाहकांना डयुटीवर असताना हँडग्लोज व मास्क बंधनकारक केले आहे.

ज्येष्ठ नागरीक, लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद; के.एम.टी. ची बससेवा टप्याटप्याने सुरु
कोल्हापूर : करोना विषाणू प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये के.एम.टी. उपक्रमाची बससेवा बंद करणेत आली होती. सेवा सुरु करणेबाबत प्रवासी, सामाजिक संघटना यांनी मागणी केली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने के.एम.टी. बससेवा सुरु करणेत सशर्त परवानगी दिली आहे.
दि.01/06/2020 पासून के.एम.टी.ची बससेवा अंशत: प्रथम 8 मार्गांवर सुरु करणेत येत असून, त्यानंतर टप्याटप्याने उर्वरित मार्गांवर बससेवा सुरु करणेचे नियोजन आहे. पहिल्या टप्यामध्ये श्री शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र ते मार्केट यार्ड, श्री शाहू मैदान बस नियंत्रण केंद्र ते विवेकानंद कॉलेजमार्गे शुगरमील, गंगावेश ते एस.टी.स्टँड, छ.शिवाजी चौक ते कळंबा, छ.शिवाजी चौक ते क्रां.नानापाटीलनगर, छ.शिवाजी चौक ते बोंद्रेनगर, तसेच छ.शिवाजी चौक ते जरगनगरमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर व छ.शिवाजी चौक ते राजारामपुरीमार्गे आर.के.नगर गणपती मंदिर या मार्गांवर एकूण 10 बसेसद्वारे सकाळी 7.00 ते सायं.7.00 पर्यंत बससेवा उपलब्ध करुन देणेत येणार आहे. बसमधून 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक व 10 वर्षाखालील लहान मुलांना तात्पुरता प्रवेश बंद करणेत आला आहे. सर्व चालक/वाहकांना डयुटीवर असताना हँडग्लोज व मास्क बंधनकारक केले आहे. तिकीट देणेपुर्वी वाहकाकडून प्रत्येक प्रवाशाला सॅनिटाईजर देणेत येईल. या बसेस वेळापत्रकाप्रमाणे धावणार नसून, उपलब्ध मार्गांवर किमान प्रवासी उपलब्ध झालेस नियंत्रण केंद्रावरुन बस सोडणेत येईल.
या मार्गावरील सर्व बसेस प्रत्येक फेरीनंतर निर्जंतुकीकरण करणेत येणार असून प्रत्येक बसमधून किमान 20 ते 22 प्रवाशांना प्रवास करता येईल. प्रवाशांना बसमध्ये मास्क वापरणे आणि सोशल डिस्टनसींगचे पालन करणे बंधनकारक आहे.
सर्व प्रवाशी नागरीकांनी स्वत:च्या सुरक्षिततेसाठी मास्क व सोशल डिस्टनसींगचे वापर करुन के.एम.टी. उपक्रमास सहकार्य करावे असे आवाहन परिवहन समिती सभापती सौ. प्रतिज्ञा महेश उत्तुरे व अति. परिवहन व्यवस्थापक सुभाषचंद्र देसाई यांनी केले आहे.