जुने बाहेर गेले ते बरं झालं, नव्यांना संधी मिळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:34+5:302021-04-04T04:24:34+5:30
(अरुण नरके यांचा फोटो वापरावा) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत प्रत्येक वेळी तीन-चार संचालक बाहेर जातात. ...

जुने बाहेर गेले ते बरं झालं, नव्यांना संधी मिळाली
(अरुण नरके यांचा फोटो वापरावा)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ च्या निवडणुकीत प्रत्येक वेळी तीन-चार संचालक बाहेर जातात. यावेळेलाही तेच झाले; पण ते बाहेर गेले ते बरं झालं, त्यामुळे नव्यांना संधी मिळाली, असा टोला ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी लगावला. माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांच्याप्रमाणे आणखी काहीजण संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.
अरुण नरके म्हणाले, ‘गोकुळ’च्या राजकारणात राज्याचे मुख्यमंत्री लक्ष घालू लागले, मंत्री-खासदारांना तो हवाहवासा वाटू लागला. हा दूध संघ एवढा मोठा झाला, याचा मला अभिमान आहे. प्रत्येक निवडणुकीत तीन-चार जण नाराज होऊन बाजूला जातात. यावेळेलाही काहीजण गेले, मात्र बरे झालं, त्यामुळे नवीन लोकांना संधी देता आली. मुख्यमंत्री, खासदार, मंत्र्यांनी लक्ष घातले तरी कोणी संघ वाढविला, याची जाणीव दूध उत्पादकांना आहे.
कर्तबगार महिला म्हणूनच ‘शौमिकां’ना संधी
शौमिका महाडिक यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून उत्कृष्ट काम केले आहे. त्यांनी आपल्या कामातून जिल्ह्यात छाप पाडली असून, त्या महादेवराव महाडिक यांच्या स्नुषा म्हणून नव्हे, तर कर्तबगार महिला म्हणूनच त्यांना उमेदवारी दिल्याचे नरके यांनी सांगितले.
मग नरके कुटुंबातीलच चर्चा का
राज्याच्या राजकारणात अनेक घरांत एकमेकांच्या विरोधात उभे राहतात. पाटील-पाटील उभे राहिले तर चालते; मग केवळ नरके कुटुंबातीलच चर्चा का? चेतन नरके यांच्यासारखा हुशार व या व्यवसायाचा अनुभव असलेला संचालक मिळाल्याने ‘गोकुळ’च्या प्रगतीत भरच पडेल, असे नरके यांनी सांगितले.
शेट्टी, आवाडे आम्हालाच पाठिंबा देतील
आमदार प्रकाश आवाडे हे नेहमी आमच्यासोबतच आहेत. राजू शेट्टी यांचा दूध संघ आहे. त्यामध्ये काय अडचणी आहेत, हे त्यांना माहिती आहे. ते ‘गोकुळ’च्या कामकाजाचे कौतुक करतात. त्यामुळे दोन्ही नेते आम्हालाच पाठिंबा देतील, असा विश्वास नरके यांनी व्यक्त केला.