कोल्हापूर जिल्ह्यात चार हजारांवर जन्म, मृत्यू नोंदींची चौकशी; किती दिवसांत बंधनकारक असते नोंदणी.. वाचा
By भीमगोंड देसाई | Updated: February 18, 2026 18:21 IST2026-02-18T18:20:26+5:302026-02-18T18:21:03+5:30
एक वर्षापेक्षा अधिक उशीर : आरोग्य प्रशासनातर्फे पडताळणी, दोषींवर जबाबदारी निश्चित होणार

कोल्हापूर जिल्ह्यात चार हजारांवर जन्म, मृत्यू नोंदींची चौकशी; किती दिवसांत बंधनकारक असते नोंदणी.. वाचा
भीमगोंडा देसाई
कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यात २ हजार ६३ जन्माच्या, तर २ हजार ८३ मृत्यूच्या नोंदी एक वर्षापेक्षा अधिक काळ उशिराने झाल्या आहेत. आरोग्य प्रशासनाकडून उशिराच्या कारणाची आणि कोण जबाबदार याची चौकशी सुरू केली आहे. नोंदणी प्रक्रियेतील अधिकारी, कर्मचारी दोषी असल्याचे समोर आले तर त्यांच्याकडून खुलासा घेऊन प्रसंगी कारवाईही होणार आहे. यामुळे प्रत्येक जन्म, मृत्यूची नोंद २१ दिवसांच्या आतच झाली पाहिजे, याकडे लक्ष देण्याच्या सूचना जिल्हा अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या आहेत.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
शिक्षण, नोकरी व इतर कारणासाठी जन्माची नोंद, तर शासकीय योजनांचा लाभ, वारसा हक्काने मिळणारी मालमत्ता आदी कायदेशीर प्रक्रियेसाठी मृत्यूची नोंद असणे आवश्यक आहे. यामुळे केंद्र शासनाच्या dc.crsorgi.gov.in या वेबसाइटवर जन्म-मृत्यूची शंभर टक्के नोंदणी ऑनलाइन केली जात आहे.
बाळाचा जन्म झाल्यानंतर संबंधित रुग्णालयास जन्माची नोंद २१ दिवसांत ऑनलाइन करणे बंधनकारक केले आहे; पण मृत्यूच्या नोंदीसाठी संबंधी यंत्रणेकडे आवश्यक कागदपत्रांसह नातेवाइकांना अर्ज करावा लागतो. जन्म-मृत्यू झालेल्या कार्यक्षेत्रातील महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्याकडे २१ दिवसांच्या आत नोंदणी करणे बंधनकारक आहे. शुल्कासह उशिराने नोंदणी करता येते. मात्र, जिल्ह्यात एक वर्षाहून अधिक काळ ४ हजार १४६ जन्म-मृत्यूच्या नोंदी झाल्या आहेत. या नोंदीची चौकशी सुरू झाली आहे.
वर्षाहून अधिक विलंबाच्या नोंदीची संख्या अशी
वर्षे - जन्म - मृत्यू
२०२३ - ५७७-७८०
२०२४ - ७१८ -६५६
२०२५ - ७६८ - ६४७
विलंबाची प्राथमिक कारणे अशी...
जन्म, मृत्यूशी संबंधित कागदोपत्री पुरावे उपलब्ध नसणे, गरिबी, स्थलांतर, रुग्णालय किंवा नागरिकांकडून माहिती पाठवण्यास उशीर, नागरिकांना २१ दिवसांच्या कालमर्यादेबाबत माहिती नसणे, अशी जन्म-मृत्यूच्या नोंदी उशिराने होण्याची प्राथमिक कारणे पुढे आली आहेत. प्रत्येक नोंदनिहाय कारण वेगवेगळे असणार आहे. त्याचीही चौकशी केली जात आहे.
कोल्हापूर शहरातही विलंबाने नोंदी
अपवाद वगळता सर्वच प्रसूती अलीकडे दवाखान्यातच होत आहे. कोल्हापूर शहरातील सर्व शासकीय, खासगी दवाखान्यांना ऑनलाइन जन्म-मृत्यू नोंदणीची माहिती लेखी, तोंडी देण्यात आली आहे. तरीही गेल्या तीन वर्षांत कोल्हापूर शहरात १५३ जन्माच्या, तर ३६ मृत्यूची नोंद एक वर्षाहून अधिक काळ विलंबाने झाली आहे. इचलकरंजीतही तीन वर्षांत २७ जन्माच्या, तर ३३ मृत्यूच्या नोंदीस उशीर झाला आहे.