आदिल फरासांकडे ‘त्या’ मुलांचे पालकत्व
By Admin | Updated: August 20, 2015 00:43 IST2015-08-20T00:43:48+5:302015-08-20T00:43:48+5:30
पोरक्यांना आधार : आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मायेची सावली

आदिल फरासांकडे ‘त्या’ मुलांचे पालकत्व
कोल्हापूर : पत्नीचा खून करून आत्महत्या केलेल्या सतीश कांबळे कुटुंबीयांच्या दोन कोवळ्या मुलांच्या पालकत्वाची जबाबदारी नगरसेवक आदिल फरास यांनी घेतली. आई-वडिलांच्या मृत्यूनंतर पोरके झालेल्या प्रज्योत (वय ७) व मुलगी अंजली (४) या चिमुकल्यांना मायेचा आधार मिळाल्याने फरास यांचे नागरिकांतून कौतुक होत आहे. बिंदू चौक बाराईमाम तालमीशेजारी राहत असलेल्या सतीश कांबळे याने रागाच्या भरात पत्नी वैशालीचा खून करून स्वत: आत्महत्या केली होती. या घटनेमुळे त्यांची दोन मुले प्रज्योत व अंजली पोरकी झाली होती. त्यांना आजी शोभा धनवडे हिचाच आधार राहिला होता परंतु आजीची परिस्थितीही गरिबीची आहे. ती देखील धुण्या-भांड्याची कामे करून दोन मुलांचा सांभाळ करते. त्यातच दोघा नातवांना सांभाळण्याची जबाबदारी पडल्याने तिच्यासमोर मोठे संकट उभे राहिले होते. आई-वडिलांपासून पोरके झालेल्या चिमुकल्यांचे पालकत्व भागातील नगरसेवक फरास यांनी स्वीकारले. या मुलांचे राहणे, शिक्षण, जेवण यासह सर्वस्वी जबाबदारी त्यांनी स्वीकारली आहे. सध्या ही मुले आजीजवळ आहेत. त्यामुळे त्यांनी शोभा धनवडे यांना बाराईमाम परिसरात राहण्यासाठी या, याठिकाणी आमचे लक्ष राहील, मुलांचा सांभाळही व्यवस्थित होईल, अशी विनंती त्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
खुनामागे दुसरेच कारण
सतीश कांबळे का कर्जबाजारी होता हे खरे असले तरी त्या कारणासाठी तो पत्नी वैशालीचा खून करणार नाही. तिचा खून केल्याने त्याने आत्महत्या केली आहे. घरखर्चासाठी पैसे मागितल्याच्या कारणातून त्याने खून केल्याचे सांगितले जात आहे परंतु दोघेही मृत झाल्याने त्यांच्यात नेमका कोणता वाद होता, हे स्पष्ट झालेले नाही. वैशालीचा खुनामागे दुसरे कारण असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करत असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.