कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या बारा जिल्ह्यांत बैठका घेतल्या आहेत, शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असून सरकारने कितीही वल्गना केल्या तरी महामार्ग होणे अशक्यच असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. शक्तिपीठाबाबत सरकारने फेरविचार करावा, असे काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.समृध्दी महामार्ग शेवटच्या टप्याच्या लोकार्पण सोहळ्यावेळी समृध्दी महामार्गाचे काम लवकरच करू, असे सुतोवाच सरकारच्या वतीने करण्यात आले. याबाबत, राजू शेट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले, शेतकऱ्यांना सरकारची मखलाशी समजल्याने ते सर्व्हे करण्यासही विरोध करत आहेत. ड्रोनव्दारे सर्व्हे केले तर ड्रोन पाडण्याचा इशारा शेतकरी देत असल्याने मोजणी यंत्रणा ठप्प आहे. सुरुवातीला देवाधर्माचे नाव केले आता सरकार विकासाची भाषा करत आहे. हे आता शेतकऱ्यांच्या लक्षात आले आहे.सरकारने फेरविचार करावा - पाटील आमदार सतेज पाटील म्हणाले, शक्तिपीठ महामार्गालाकोल्हापूरसह सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा विरोध आहे. लोकभावनेचा आदर करुन सरकारने फेरविचार करावा. तेच पैसे ग्रामीण भागातील रस्त्यासाठी खर्च केले तर अधिक चांगले होईल. शासनाला आम्ही पर्यायी मार्ग सुचवले आहेत. त्याचा विचार करून शक्तिपीठचा अट्टाहास सोडावा. आमच्या माहितीनुसार कामे पूर्ण करुनही ८० हजार कोटी रुपयांची बिले थकीत आहेत. संबंधितांना हे पैसे दिले तर इतर कामांना गती येईल. शक्तिपीठऐवजी आम्ही पर्यायी रस्ते सुचवले आहेत, त्याचा विचार केला तर शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले होईल.
शक्तिपीठाबाबत सरकारच्या वल्गनाच, महामार्ग अशक्यच; राजू शेट्टी यांची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 18:58 IST