गावचे ‘लोकमत’ मिळवत विकासाभिमुख काम करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:24 IST2018-01-04T00:15:03+5:302018-01-04T00:24:18+5:30

गावचे ‘लोकमत’ मिळवत विकासाभिमुख काम करा
कोल्हापूर : ग्रामविकासाच्या क्षेत्रामध्ये भरीव काम करणाºयांना ‘लोकमत’ने भव्य व्यासपीठ दिले असून, ‘सरपंच अवॉर्डस’च्या माध्यमातून तुमच्या कामाची दखल घेत पाठीवर थाप मारली आहे. आता गावात जाऊन आणखी विकासाभिमुख काम करून लोकमत मिळवा, असे आवाहन माजी ग्रामविकास राज्यमंत्री आमदार सतेज पाटील यांनी केले.
पाटील म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद या त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून ग्रामीण यंत्रणा बळकट करण्याचा प्रयत्न केला. सरपंचांनी विकासाचे मॉडेल तयार करून ग्रामपंचायतींच्या आर्थिक योजना ताकदवान बनविल्या पाहिजेत. लोकनियुक्त सरपंचांना कायद्याने अधिकार दिले आहेत. त्यांचा वापर जनकल्याणासाठी केला पाहिजे. सांडपाणी आणि कचरा व्यवस्थापन या प्रमुख समस्या गावांना त्या प्राधान्याने सोडविण्यासाठी पाच-सहा ग्रामपंचायतींचे क्लस्टर केले पाहिजे. ग्रामपंचायतींना वायफायचे फॅड आले आहे. नवतंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे; पण प्राधान्य कशाला द्यायचे, हेही समजले पाहिजे. ‘लोकमत’ने तुमची पाठ थोपटली आहे. येथून जाताना विकासाचा मंत्र घेऊन जावा, असे आवाहनही पाटील यांनी केले.
दरम्यान, पुढील वर्षीच्या ‘लोकमत’ पुरस्कार मूल्यांकनामध्ये रस्ते, गटारी यांची नोंद घेऊ नये. कचरा व सांडपाणी व्यवस्थापनाला प्राधान्य देऊन त्यानुसार मूल्यांकन करण्याची सूचना सतेज पाटील यांनी केली.
सरपंचांच्या मानधनाचे अध्यक्षांनी बघावे
‘सरपंचांचे वाढीव मानधन कागदावरच’ या ‘लोकमत’मधील वृत्ताचा धागा पकडत सरपंच मानधनवाढीचा कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांनी प्रयत्न करावेत, असेही आमदार पाटील यांनी सांगितले.