‘अंबाबाई’साठी तोडगा काढा
By Admin | Updated: December 6, 2014 00:32 IST2014-12-05T23:56:27+5:302014-12-06T00:32:18+5:30
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

‘अंबाबाई’साठी तोडगा काढा
कोल्हापूर : कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्यावरून गेल्या चौदा वर्षांपासून सुरू असलेल्या वादावर सर्व संबंधित घटकांनी सकारात्मक भूमिका घेतली, तर देवीची मूर्ती अनंतकालापर्यंत भक्तांना शुभाशीर्वाद देत राहील; कारण सर्वांनी उपस्थित राहून तोडगा काढला तर वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या अवघ्या तीन ते चार सुनावणींमध्ये हा वाद मिटणार आहे.
अंबाबाईच्या मूर्तीला वज्रलेप करण्याच्या निर्णयाला श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी विरोध केल्यानंतर हा वाद न्यायालयात गेला. ‘केमिकल कॉन्झर्व्हेशन की वज्रलेप?’ या वादात न पडता मूर्तीच्या संरक्षणासाठी एक पाऊल मागे येण्याची तयारी त्यावेळी दाखविली गेली नाही. त्यावर कोणताच तोडगा निघत नाही; पण मूर्तीची झीज काही थांबत नाही, हे पाहून हक्कदार श्रीपूजक मंडळ व प्रतिवादींनी हा वाद वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे वर्ग करण्याची विनंती केली. या प्रकरणात एक वादी आणि आठ प्रतिवादी आहेत. आता हा वाद वैकल्पिक वाद निवारण केंद्राकडे जाऊन तो मिटण्याची चिन्हे निर्माण झाल्यानंतर श्रेयवादावरून वितुष्ट येऊ नये, अशी श्रीपूजक मंडळाची भूमिका आहे. हे प्रकरण मार्गी लागावे यासाठी वादींप्रमाणे प्रतिवादी असलेल्या श्रीपूजक मंडळानेही तितकेच प्रयत्न केले आहे. तसेच केमिकल कॉन्झर्व्हेशनला संमती दर्शविली आहे, असे मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. ‘पुरातत्त्व’ने वज्रलेपाविरोधात अहवाल दिला. केमिकल कॉन्झर्व्हेशनचा मार्ग मोकळा झाला. वादी-प्रतिवादींनी सुनावणीस उपस्थित राहिल्यास देवीच्या मूर्तीच्या संरक्षणासाठी योग्य पावले उचलली जातील.
जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
वज्रलेप समितीचे अध्यक्षपद, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष ही तीनही महत्त्वाची पदे असलेल्या जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी या प्रकरणात लक्ष घातले तर वज्रलेपाचा प्रश्न तातडीने मिटणार आहे. वज्रलेप समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी किंवा अन्य प्र्रतिनिधींनी केमिकल कॉन्झर्व्हेशनला होकार दिला की मूर्ती संवर्धनाचा मार्ग सुकर होईल; पण त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
वज्रलेपाचा वाद गजानन मुनीश्वर यांच्यामुळे खोळंबला आहे. त्यावेळी कोर्टात वज्रलेप, केमिकल कॉन्झर्व्हेशन या शाब्दिक खेळीत न अडकता मूर्तिसंवर्धनासाठी आपण सकारात्मकतेने पुढाकार घेऊ. यासाठी गजानन मुनीश्वर यांना राजी करण्यासाठी श्रीपूजक मंडळाने प्रयत्न केले होते. आता त्यांना केमिकल कॉन्झर्व्हेशन योग्य वाटत असेल तर जगदंबेने त्यांना इतक्या वर्षांनी सद्बुद्धीच दिली असे म्हणावे लागेल.
- अजित ठाणेकर (श्रीपूजक)