थेट संवाद: शुभांगी शिरगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:24 IST2021-04-04T04:24:19+5:302021-04-04T04:24:19+5:30

खाकीला समाजात खूप ग्लॅमर आहे; पण या झगमगाटामागे किती कष्ट आणि जबाबदाऱ्या आहेत, याचे भान बऱ्याचवेळा नसते. खाकी अंगावर ...

Direct Dialogue: Shubhangi Shirgave | थेट संवाद: शुभांगी शिरगावे

थेट संवाद: शुभांगी शिरगावे

खाकीला समाजात खूप ग्लॅमर आहे; पण या झगमगाटामागे किती कष्ट आणि जबाबदाऱ्या आहेत, याचे भान बऱ्याचवेळा नसते. खाकी अंगावर चढली की समाजाच्याही अपेक्षा वाढतात, त्यामुळेच पोलिसांकडेही माणूस म्हणून बघण्याची मानसिकता वाढण्याची नितांत गरज आहे.

शुभांगी शिरगावे, पोलीस उपनिरीक्षक

नसिम सनदी : लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : शुभांगी शिरगावे ही अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील शेतकरी मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या तुकडीत राज्यात पहिली आली. महाराष्ट्र पोलीस अकॅडमीकडून बेस्ट कॅडेट म्हणून दिला जाणाऱ्या रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनरचीही मानकरी ठरली. ग्रामीण पार्श्वभूमी असतानाही केवळ जिद्दीच्या जोरावर मिळविलेल्या या यशाने कोल्हापूरच्या मातीचा नव्याने सन्मान झाला. मुलींच्या मनगटातही बळ आहे, त्याला पाठबळ दिले की मुलगा, मुलगी या भेदाच्याही पलीकडे जाऊन कर्तृत्वाचे नवे आयाम रचले जातात, हे सिद्ध करून दाखविणाऱ्या शुभांगी शिरगावे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद.

प्रश्न : पोलीस क्षेत्रात का जावे वाटले?

उत्तर : पोलीस व्हायचे असे काही ठरविले नव्हते; पण बी.ए.ची पदवी घेत असताना खाकी वर्दीची प्रचंड क्रेझ वाटायची. त्यांना मिळणारा मानसन्मान, त्यांचा रुतबा नेहमी खुणावत होता. कुटुंबात कोणी या क्षेत्रात नव्हते. सुदैवाने माझी उंची व शारीरिक क्षमता चांगली असल्याने पदवीनंतर यात एक ट्राय मारू असा विचार केला आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. विशेष म्हणजे मी पासही झाले. मग पुढे आत्मविश्वास वाढत गेला आणि पुन्हा एकदा ही परीक्षा देत राज्यात मुलींमध्ये पहिली आले.

प्रश्न : पीएसआयचे ट्रेनिंग घेतानाचे काय अनुभव होते.

उत्तर : एमपीएससीतून राज्यातील एक लाख उमेदवारांतून ६६८ जणांची प्रशिक्षणासाठी निवड झाली, त्यात मीही होते. नाशिकमधील पोलीस अकॅडमीमध्ये तब्बल १५ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. प्रशिक्षणाचा काळ शारीरिक आणि मानसिक कसोटीची परीक्षा पाहणारा असतो. नेहमी १२ महिन्यांचे असणारे हे ट्रेनिंग कोरोनामुळे आम्हाला १५ महिने करावे लागले. या काळात ६६८ जण प्रशिक्षणार्थी सोडलो तर कुणाशीही भेटता येत नव्हते, कुटुंबीयांचीही अजिबातच भेट नव्हती. असे जरी असले तरी हा काळ आयुष्यातील सर्वोत्तम काळ ठरला. आयुष्याचे ध्येय सापडल्यानंतर जसा आनंद होतो, अगदी तसाच अनुभव या काळात आला. खऱ्या अर्थाने अधिकारी म्हणून घडविणारा हा काळ होता.

प्रश्न : रिव्हॉल्व्हर ऑफ ऑनर हा सन्मान नेमका काय आहे.

उत्तर : राज्यातील ६६८ जण प्रशिक्षणासाठी होते. त्यात १८८ मुली व ४८० मुले होती. नाशिकमधील या प्रशिक्षण सेंटरमध्ये झालेल्या परीक्षांमध्ये ११ बक्षिसे मी जिंकली. ६६८ प्रशिक्षणार्थींमध्ये मी बेस्ट कॅडेट म्हणून निवडली गेली. ही निवड झाली की मानाची तलवार सलामी म्हणून दिली जाई; पण या वर्षापासून रिव्हॉल्व्हर देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याची पहिली मानकरी होण्याचा मान मला मिळाला याचा खूप आनंद आहे.

चौकट ०१

ही तर मदर इन्स्टिट्यूट

लिंगभेदाच्या पलीकडे प्रशिक्षण असते. कोणतीही सवलत अथवा शॉर्टकट तुम्हाला मिळत नसतो. तुम्ही योग्यता दरवेळी सिद्ध करावी लागते. या सेंटरमध्ये शारीरिक, मानसिक आणि कायदेविषयक सर्व प्रकारचे प्रशिक्षण देऊन तुम्हाला सर्वांगीण बनविले जाते. एक आई ज्याप्रमाणे सेवा करते, घडविते, त्याप्रमाणे सरकार या अकॅडमीच्या माध्यमातून राज्यातील भावी अधिकारी घडवितात.

चौकट ०२

पॅशन असेल तर या

खाकी वर्दीचे ग्लॅमर म्हणून फक्त झगमगाटाला भुलून या क्षेत्रात यायचे तर अजिबात येऊ नका. तुमच्यात पॅशन पाहिजे, सर्व प्रकारच्या लोकांचा सामना करण्याची तुमच्यात रग पाहिजे, चौकटीच्या पलीकडचे, तडजोडीचे आयुष्य जगण्याची इच्छा असेल तरच या, अन्यथा दुसरे क्षेत्र निवडा.

फोटो: ०३०४२०२१-कोल-शुभांगी शिरगाव पीएसआय

Web Title: Direct Dialogue: Shubhangi Shirgave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.