corona virus : कोल्हापुरात १०९३ नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 20:43 IST2020-09-04T20:43:08+5:302020-09-04T20:43:54+5:30
सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

corona virus : कोल्हापुरात १०९३ नवे रुग्ण, २१ जणांचा मृत्यू
कोल्हापूर : सप्टेंबर महिन्यात कोरोनाचा भडका उडेल, या मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्याप्रमाणे कोरोनाचा खरोखरच भडका उडतोय की काय, अशी शंका कोल्हापूरकरांना येऊ लागली आहे; कारण शुक्रवारी एकाच दिवसात जिल्ह्यात १०९३ नवीन रुग्ण आढळून आले; तर २१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक वाढत चालला आहे. गुरुवारपर्यंत जिल्ह्यात २६ हजार ३४४ रुग्णांची नोंद झाली होती. त्यात शुक्रवारी आणखी १०९३ नवीन रुग्णांची भर पडली; तर ७१७ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. शुक्रवारी आणखी २१ जणांंचा मृत्यू झाला. त्यामुळे कोल्हापूरकरांच्या मनात आता कोरोनाची चांगलीच धडकी भरली आहे.
कागल तालुक्यात रुग्णांची तसेच मृत्यूंची संख्या वाढू लागल्याने तसेच सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याच्या शक्यतेने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत संपूर्ण कागल तालुक्यात दि. ६ ते १५ सप्टेंबर असे सलग १० दिवस जनता कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय घेतला. या काळात कोणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ज्या भागात मोठ्या संख्येने रुग्ण सापडत आहेत, त्या भागावर विशेष लक्ष द्या, रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा जलदगतीने शोध घेऊन त्यांच्या चाचण्या व उपचार करा, अशा सक्त सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.