कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच; सात मृत्यू, तर २०२ नवीन रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 19:35 IST2020-07-25T19:34:42+5:302020-07-25T19:35:42+5:30
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या २४ तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला; तर २०२ नवीन रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, संस्थात्मक अलगीकरण केंद्रातूनच आता बाधित रुग्णांवर उपचार केले जाऊ लागले आहे.

कोल्हापुरात कोरोनाचा उद्रेक सुरूच; सात मृत्यू, तर २०२ नवीन रुग्ण
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरूच असून गेल्या २४ तासांत सात रुग्णांचा मृत्यू झाला; तर २०२ नवीन रुग्ण आढळून आले. दरम्यान, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या यंत्रणेवर प्रचंड ताण आला असून, संस्थात्मक अलगीकरण केंद्रातूनच आता बाधित रुग्णांवर उपचार केले जाऊ लागले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ३९२४ वर जाऊन पोहोचली आहे. त्यांपैकी २५९५ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार केले जात आहेत. रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, तशी मृत्यू होणाऱ्यांचीही संख्या वाढू लागली असल्याने चिंतेचे तसेच घबराटीचे वातावरण तयार होऊ लागले आहे. मागच्या २४ तासांत जिल्ह्यात सात रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाने मृत झालेल्यांची संख्या १०६ वर जाऊन पोहोचली.
शनिवारी दिवसभरात समोर आलेल्या कोरोनाबाधित रुग्णांच्या अहवालावरून कोल्हापूर शहराबरोबरच जिल्ह्यातील राधानगरी, हातकणंगले, करवीर तालुक्यांत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आले. शुक्रवारी (दि. २४) रात्री आठ ते शनिवारी सायंकाळी सातपर्यंत २०२ रुग्ण आढळून आले.
रुग्णसंख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणेत गोंधळ उडत चालला आहे. उपचारांतील काही त्रुटी समोर येत आहेत. गुरुवारी (दि. २३) रात्री सीपीआर रुग्णालयात बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला होता, तशाच प्रकारे अन्य तीन रुग्णांचाही उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाल्याची बाब राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर रुग्णालय प्रशासनाच्या नजरेस आणून दिली. उपचाराअभावी मृत्यू झालेल्या रुग्णांच्या चौकशीचा अहवाल दोन दिवसांत द्या, जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशा सूचना त्यांनी प्रशासनास दिल्या आहेत.