‘भाजप सरकार, चले जाव’: हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2023 16:38 IST2017-11-30T01:11:01+5:302023-09-05T16:38:17+5:30
कोल्हापूर : राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही.

‘भाजप सरकार, चले जाव’: हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’
कोल्हापूर :राज्यातील एकही घटक सरकारच्या कामावर समाधानी नाही. कर्जमाफीत शेतकºयांची फसवणूक केली आहे. सारे राज्य खड्ड्यात अडकले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. राज्यावर साडेचार लाख कोटींच्या कर्जाचा बोजा आहे, त्याची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी करत ‘भाजप सरकार चले जाव’, असा इशारा राष्टÑवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.
निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हाधिकाºयांसह कोणीच नसल्याने मुश्रीफ संतापले. राष्टÑवादीच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हल्लाबोल’ मोर्चा काढला. दसरा चौकातून सुरू झालेल्या मोर्चाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात सभेत रूपांतर झाले.
यावेळी मुश्रीफ म्हणाले, सरकारच्या धोरणाने गरीब माणूस भरडला जात असून, कर्जमाफीचा तर अक्षरश: बट्ट्याबोळ केला आहे. राज्य व केंद्र सरकार सामान्य माणसाची पिळवणूक करत असून, कर्जमाफीत काहीच हातात पडले नसल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले. आश्वासनांपलीकडे या सरकारने काहीच दिले नसून, लबाड सरकारला खाली खेचण्यासाठी राष्टÑवादीच्या कार्यकर्त्यांनी जिवाचे रान करावे, असे आवाहन माजी आमदार के. पी. पाटील यांनी केले. उपजिल्हाधिकारी (महसूल) अरविंंद लाटकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आमदार संध्यादेवी कुपेकर, महापौर हसिना फरास, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील, भैया माने, चंगेजखान पठाण, अनिल साळोखे, मधुकर जांभळे, रामराजे कुपेकर, संगीता खाडे, आदिल फरास, आदी उपस्थित होते.
उद्धवजी, आता जोडे हाणाच
शिवसेना सत्तेला चिकटून बसली असून सत्तेचा मोह सुटत नाही. सत्तेत राहायचे आणि राज्यभर सरकार विरोधात भूमिका घ्यायची हे आता त्यांनी बंद करावे. चांगला कारभार केला नाही तर जोडे मारू, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. आता त्यांनी जोडे मारण्याची वेळ आल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
वाटलावीन कर्जमाफी!
चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथील शेतकरी तानाजी खोत यांनी ‘आॅनलाईन कसली ही तर वाटलावीन कर्जमाफी’ असल्याची टीका केली.