भानु अथय्या यांचे कोल्हापूरशी ऋणानुबंध : जीवनगौरव पुरस्काराने सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 13:50 IST2020-10-16T13:48:12+5:302020-10-16T13:50:25+5:30
कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील राजोपाध्येंच्या वाड्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण एमएलजीमध्ये घेतल्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचे शिक्षण घेतले. यानंतर कधीही मागे वळून न पाहिलेल्या या लेकीने देशाला १९८२ साली पहिलं वहिलं ऑस्कर मिळवून दिले.

कोल्हापुरात कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २००९ साली झालेल्या पहिल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये भानु अथय्या यांना ज्येष्ठ दिग्दर्शक किरण शांताराम यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी अमोल गुप्ते, ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना, तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख, सचिन खेडेकर व चंद्रकांत जोशी उपस्थित होते. (आदित्य वेल्हाळ)
कोल्हापूर : कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील राजोपाध्येंच्या वाड्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण एमएलजीमध्ये घेतल्यानंतर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये कलेचे शिक्षण घेतले. यानंतर कधीही मागे वळून न पाहिलेल्या या लेकीने देशाला १९८२ साली पहिलं वहिलं ऑस्कर मिळवून दिले.
ज्येष्ठ वेशभूषाकार भानु अथय्या यांच्या निधनानंतर त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला आहे. येथे २००९ साली झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होेते.
भानु अथय्या यांचे मूळ नाव भानुमती. वडील आण्णासाहेब राजोपाध्ये हे छत्रपती घराण्याशी संबंधित होते. आई शांताबाई या गृहिणी. या दांपत्याच्या सात मुलांपैकी त्या तिसऱ्या. त्या नऊ वर्षाच्या असताना वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे शालेय शिक्षण एमएलजी हायस्कूलमध्ये झाले.
बालपणापासूनच त्यांना चित्रकलेची आवड होती. याच क्षेत्रातील पुढचे शिक्षण घेण्यासाठी त्यांनी मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये प्रवेश घेतला. एका मासिकासाठी काम करत असताना त्यांचा हिंदी चित्रपटसृष्टीशी संबंध आला आणि वेशभूषाकार म्हणून त्यांची कारकीर्द सुरू झाली, आणि त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. गांधी चित्रपटासाठी १९८२ साली ऑस्कर पुरस्कार मिळाल्यानंतर त्यांचा कोल्हापूर महापालिकेच्यावतीने जाहीर सत्कार करण्यात आला होता.
त्यानंतर राजर्षी शाहू महाराजांच्या चरित्रावर आधारित मालिकेसाठी त्यांनी महाराजांच्या भूमिकेत असलेले राहुल सोलापूरकर यांच्यासाठी वेशभूषा केली होती. पुढे त्यांनी ही जबाबदारी दिग्दर्शक चंद्रकांत जोशी यांच्यावर सोपवली.
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीच्यावतीने २००९ साली घेण्यात आलेल्या पहिल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिव्हलसाठी त्या कोल्हापुरात आल्या. यावेळी त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या कार्यक्रमानंतरही दोन, तीन वेळा त्या कोल्हापुरात येऊन अंबाबाईचे दर्शन घेऊन गेल्या होत्या.
करवीरच्या कन्या असलेल्या आणि जागतिक पातळीवर ऑस्कर पुरस्कार मिळालेल्या भानु अथय्या यांचे कला क्षेत्रातील योगदान नेहमीच सर्वांना प्रेरणा देत राहील. मुंबईतील चित्रपट क्षेत्रात आपल्या सर्जनशील कलेने दिलेले त्यांचे योगदान महिलांसाठी आदर्शवत आहे.
- आमदार चंद्रकांतदादा पाटील