बेड्स, इंजेक्शन्स मिळत नसताना सकारात्मक कसं राहायचं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:29 IST2021-04-30T04:29:14+5:302021-04-30T04:29:14+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : कोरोना झाला तरी घाबरू नका, सकारात्मक राहा, ...

बेड्स, इंजेक्शन्स मिळत नसताना सकारात्मक कसं राहायचं
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना झाला तरी घाबरू नका, सकारात्मक राहा, असे सांगणाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मात्र जेव्हा आई, वडिलांना, भाऊ, बहिणीला रेमडेसिविर इंजेक्शन मिळत नाही, आजोबांसाठी बेड मिळत नाही, दहा हॉस्पिटलना फोन लावावा लागतो, तेव्हा ही सकारात्मकता कुठून आणायची, असा जळजळीत सवाल कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांकडून विचारला जात आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मृतांची तर संख्या गेले काही दिवस सरासरी २५ च्या पुढेच आहे. एका दिवसात ४१ अशी उच्चांकी मृतांची संख्या नोंदवण्यात आली आहे. गेले वीस ते बावीस दिवस जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत गेली आणि ऑक्सिजन बेड्सची कमतरता भासू लागली. त्यामुळे या रुग्णालयातून त्या रुग्णालयाकडे फेऱ्या मारण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे.
रेमडेसिविर इंजेक्शन्ससाठी नागरिक अक्षरश: वणवण करत आहेत. कुठून कुठून ओळख काढून इंजेक्शनची मागणी केली जात आहे. डॉक्टर रेमडेसिविर आणा म्हणून सांगतात आणि तेथूनच नातेवाईकांच्या हतबलतेला सुरुवात होते. तीच कहाणी ऑक्सिजनची. ऑक्सिजन कमी असल्याच्या बातम्या वाचून नातेवाईकांचा श्वास गुदमरायची वेळ आली आहे. यातील एकही गोष्ट सर्वसामान्यांच्या हातातील नाही. समाजातील प्रतिष्ठित आणि मान्यवरांनीही हात टेकल्याची परिस्थिती असल्याने सर्वसामान्यांचा तर यात पालापाचोळा झाल्यासारखी स्थिती आहे.
आधी रुग्णालय मिळविण्यासाठी, नंतर ऑक्सिजन बेड मिळविण्यासाठी, नंतर रेमडेसिविर इंजेक्शन पाहिजे म्हणून आणि सगळ्यात शेवटी बिलाचा आणि खर्चाचा आकडा... यामुळे मध्यमवर्गीय नागरिकही पिचून गेला आहे.
चौकट
सकारात्मक संदेशांचा पाऊस
कोरोनामुळे हे भयानक चित्र सर्वत्र दिसत असताना, आज दुसऱ्यासाठी रेमडेसिविरबाबत शब्द टाकताना माझ्याच घरातील कोणाला लागलं तर काय करायचं, असा प्रश्न उपस्थित होत असताना, समाजमाध्यमांवर मात्र सकारात्मक राहा, असे ढिगाने मेसेज येत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सकारात्मक राहायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे.
चौकट
आमदार-खासदार कुठे आहेत..
एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनामुळे गेल्या साडेतीन महिन्यात ४३४ जण मृत्यू पावले असताना, ‘गोकुळ’च्या निवडणुकीवरून जे वातावरण तापले आहे, याबद्दलही नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. मंत्री, खासदार, आमदार सगळेचजण या निवडणुकीत गुंतले आहेत. जरी मंत्री वेगवेगळ्या बैठका घेऊन यंत्रणा कामाला लावत असले तरी, सत्तारूढ आणि विरोधक या सर्वांचेच ‘गोकुळ’ निवडणुकीलाच प्राधान्य असल्याबद्दल ही नाराजी आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा जिल्हाबंदीचा आदेश मागे घेण्याचा प्रकार यातूनच झाल्याचीही चर्चा नागरिकांमध्ये आहे.