चिकोत्रा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:21 IST2021-04-05T04:21:15+5:302021-04-05T04:21:15+5:30
उत्तूर : आजरा तालुक्यातील चिकोत्रा पाटबंधारे प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने दिलासा मिळाला आहे. मे अखेर २५ टक्के पाणीसाठा ...

चिकोत्रा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा
उत्तूर :
आजरा तालुक्यातील चिकोत्रा पाटबंधारे प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा शिल्लक असल्याने दिलासा मिळाला आहे. मे अखेर २५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता आहे. प्रकल्पात पूर्ण पाणीसाठा झाल्याने गेली दोन वर्षे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाला आहे. मे अखेर तीन आवर्तने सोडण्यात येणार आहे.
मागील वर्षी झालेल्या संततधार पावसामुळे चिकोत्रा धरण पूर्ण क्षमतेने भरले गेल्याने लाभक्षेत्र व बुडीत क्षेत्रातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. सन २०११ पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला नव्हता. २०१८ पासून प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. गतवर्षी धरणक्षेत्र व म्हातारीचे पठार व अरळगुंडी (ता. भुदरगड) येथील पठारावर वळवलेले पाणी यामुळे प्रकल्प लवकरच तुडुंब भरला. सध्या अरळगुंडीच्या पठारावर दोन बंधारे बांधण्याचे काम सुरू झाल्याने प्रकल्प यावर्षी लवकरच भरण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सर्वांत उशिरा भरणारा प्रकल्प म्हणून चिकोत्राची नोंद आहे. बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले की, प्रकल्प तुडुंब भरणार आहे. सध्या प्रकल्पात ८६०.२१० द.ल.घ.फू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मार्चअखेर पाच आवर्तनात पाणी सोडण्यात आले. एप्रिल ते जूनअखेर तीन आवर्तने पाणी सोडण्याचे नियोजन आहे.
--------------------------
फोटो ओळी : झुलपेवाडी (ता. आजरा) येथील चिकोत्रा प्रकल्पात असलेला पाणीसाठा. (ऋतुजा फोटो)
क्रमांक : ०४०४२०२१-गड-०४