कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम: पैसेवाल्यांना पायघड्या; कार्यकर्त्यांच्या दांड्या

By भारत चव्हाण | Updated: June 13, 2025 12:08 IST2025-06-13T12:07:46+5:302025-06-13T12:08:11+5:30

चार सदस्य प्रभाग रचनेमुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांत नाराजी

activists unhappy over four member ward formation in Kolhapur Municipal Corporation | कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम: पैसेवाल्यांना पायघड्या; कार्यकर्त्यांच्या दांड्या

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचे पडघम: पैसेवाल्यांना पायघड्या; कार्यकर्त्यांच्या दांड्या

भारत चव्हाण 

कोल्हापूर : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने घेतलेला चार सदस्यीय प्रभाग रचना करण्याचा निर्णय पक्षीय पातळीवर सोयीचा असला, तरी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या दृष्टीने मात्र तो तोंडाला फेस आणणारा तसेच सर्वसामान्य उमेदवारांची निवडणुकीपूर्वीच दांडी उडवणारा असल्याची सार्वत्रिक भावना व्यक्त होत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ज्यांचे शहरात काम आहे, ज्यांचे नाव आहे आणि ज्यांच्याकडे पैसा आहे असेच सशक्त उमेदवार निवडून येणार आहेत.

कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक ‘एक प्रभाग चार सदस्य’ अशा प्रभाग रचनेच्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे अगोदरच साडेचार वर्षे निवडणुकीची प्रतीक्षा करून निराश झालेल्या शेकडो इच्छुक उमेदवारांचे चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे धाबे दणाणले आहेत. ‘एक प्रभाग एक सदस्य’ अशा निवडणूक पद्धतीमुळे सर्वपक्षीय उमेदवारांसह सर्वसामान्य उमेदवारांना देखील निवडणूक लढवणे सर्वार्थाने सोयीचे होते. उमेदवारांना साडेपाच ते साडेसहा हजार मतदारांसमोर निवडणूक काळात पोहोचणे सहज शक्य होते, आर्थिकदृष्ट्याही परवडणारे होते. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांचा मतदारांशी संपर्क असायचा. आता चार सदस्यीय प्रभागामुळे हे सर्व अशक्य होणार आहे.

नवीन प्रभाग रचना जाहीर व्हायला किमान महिना, दीड महिना लागणार आहे. प्रभाग निश्चित झाल्यानंतरच उमेदवारांना मतदारांसमोर जावे लागणार आहे. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रभागातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे सर्वच उमेदवारांसमोर मोठे आव्हान असेल. विशेष म्हणजे काही ठराविक जण सोडले तर बहुसंख्य इच्छुक उमेदवार पलिकडील प्रभागात पोहोचलेले नाहीत. चार प्रभागांत पोहोचणे तर दूरच आहे. त्यामुळे चार सदस्यांच्या एक प्रभागात साधारणपणे २५ ते ३० हजार मतदारांपर्यंत पोहोचताना उमेदवारांच्या खिशाला तर कात्री लागणारच आहे, शिवाय तोंडालाही फेस येणार आहे.

निवडणूक कोणालाच सोपी नाही

राजकीय पक्षांच्या दृष्टीने हा निर्णय चांगलाच आहे. त्यांना युती, आघाडी करून उमेदवारांचे पॅनल करावे लागणार आहे. ज्या राजकीय पक्षांकडे एखाद्या प्रभागात दोन किंवा तीन उमेदवार चांगल्या ताकदीचे असतील तर चौथ्या उमेदवाराला ते निवडून आणू शकतात. पण एकच उमेदवार ताकदीचा आहे आणि बाकीचे तीन कमकुवत असतील तर ताकदवान उमेदवाराचा देखील पराभव होणार आहे. त्यामुळे निवडणूक कोणालाच सोपी राहिलेली नाही.

चार सदस्य प्रभागामुळे ही निवडणूक पैसेवाल्यांची झाली आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणूक लढवणे अशक्य आहे. कारण त्यांना निवडणूक सोपी राहिलेली नाही. निवडणुकीनंतर एकाच प्रभागात चार नगरसेवकांनी कामे कशी करायची, हाही प्रश्न निर्माण होणार आहे. - सुभाष बुचडे, माजी नगरसेवक
 

ज्या उमेदवारचे काम आहे, नाव आहे आणि ज्याच्याकडे पैसा आहे, तोच उमेदवार राजकीय पक्षांच्या यादीत असेल. पक्षीय तसेच नागरिकांच्या सेवेत कायम असणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना कमी संधी मिळणार आहे. - संजय मोहिते, माजी उपमहापौर

Web Title: activists unhappy over four member ward formation in Kolhapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.