आठवीतील विद्यार्थिनीला ५०० उठाबश्यांची शिक्षा, मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 01:20 IST2017-12-14T01:19:49+5:302017-12-14T01:20:04+5:30
शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीला ५०० उठाबश्या काढण्याची शिक्षा देणा-या मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचा आणि या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचा आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित शिक्षणाधिका-यांना दिला आहे. अश्विनी देवणे असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.

आठवीतील विद्यार्थिनीला ५०० उठाबश्यांची शिक्षा, मुख्याध्यापिकेचे वेतन रोखले
चंदगड (कोल्हापूर) : शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल आठवीत शिकणा-या विद्यार्थिनीला ५०० उठाबश्या काढण्याची शिक्षा देणाºया मुख्याध्यापिकेचे वेतन थांबविण्याचा आणि या प्रकरणाची चौकशी करून अहवाल पाठविण्याचा आदेश शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी संबंधित शिक्षणाधिका-यांना दिला आहे. अश्विनी देवणे असे या मुख्याध्यापिकेचे नाव आहे.
चंदगड तालुक्यातील कानूर बुद्रूक येथील भावेश्वरी संदेश विद्यालयात आठवीमध्ये विजया निवृत्ती चौगुले शिक्षण घेते. शाळेत सांगितलेला शालेय प्रकल्प पूर्ण न केल्याबद्दल तिला तब्बल ५०० उठाबश्या काढण्याची शिक्षा मुख्याध्यापिका देवणेयांनी दिली होती.
३०० उठाबश्या काढल्यानंतर तिच्या उजव्या पायाच्या नसा सुजून रक्तपुरवठा गोठला व ती भोवळ येऊन जागेवर कोसळली. त्यामुळे तिला अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
संबंधित विद्यार्थिनीला शिक्षण प्रक्रियेपासून दूर ठेवू पाहणा-या व अपंगत्व देणा-या मुख्याध्यापिकेची चौकशी करून कडक कारवाई करावी, अशी मागणी आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी निवेदनाद्वारे केली. त्याची दखल घेत शिक्षणमंत्री तावडे यांनी या मुख्याध्यापिकेचे वेतन रोखण्याचा आदेश दिला आहे. मात्र या घटनेमुळे विभागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत़
हा गंभीर प्रकार निदर्शनास आल्यानंतर या प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधित शिक्षण अधिकाºयांकडून ताबडतोब चौकशी अहवाल मागविण्यात आला. यानंतर मुख्याध्यापिका देवणेयांचे वेतन थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- विनोद तावडे,
शालेय शिक्षणमंत्री