त्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाहीत; एकनाथ खडसेंनी व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2022 22:37 IST2022-06-26T22:37:13+5:302022-06-26T22:37:45+5:30
कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार आयोजित केला होता.

त्याशिवाय शिंदे इतके धाडस करणार नाहीत; एकनाथ खडसेंनी व्यक्त केला संशय
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण: सध्या जे राजकारण चालले आहे तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असला तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. त्यामुळे हे सगळ घडतंय , असे म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे भविष्यात समोर येईलच असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणात केले.
कल्याण डोंबिवली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस व खान्देश ज्ञाती समाजातर्फे खडसे यांचा रविवारी सत्कार आयोजित केला होता. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे विधान केले.
गेल्या ४० वर्षात असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कुणाबरोबर आहे यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतू तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.
प्रामाणिकपणे काम करून माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राजकारण इतक्या खालच्या स्तराला जातं हे आयुष्यात पहिल्यांदा अनुभवलय. चौकशा झाल्या इथपर्यंत ठीक होते, नंतरच्या कालखंडात माझ्या कुटुंबाला त्रास दिला. मागच्या आठवड्यात माझे बँक खाते सीझ करून खात्यात एक रुपयाही ठेवलेला नाही. त्यानंतर राहते घर १० दिवसात खाली करण्याची नोटीस आली. न्यायालयातून जावून स्टे आणला म्हणून त्या घरात राहतोय. असं खालच्या स्तराचं राजकारण अनुभवलं नव्हते, असे खडसे म्हणाले.
अनेकांना मला छळता आलं असतं, माझ्या हातात इतकी ताकद आणि शक्ती आहे की अनेकांना देशोधडीला लावू शकतो. दुर्दैवाने असा विचार मी करत नाही. दुस-यांना नेहमीच सहकार्य करण्याची भूमिका असते. या सगळ्या अडचणीत शरद पवार यांनी साथ दिली. मदत केली नसती तर नाथाभाऊ होत्याचा नव्हता झाला असता, असे खडसे सत्कार समयी म्हणाले.