लोकलमध्ये ‘स्टुडंट कोच’चा प्रस्ताव १४ वर्षांपासून सरकारकडे धूळ खात; मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 06:47 IST2026-02-13T06:47:57+5:302026-02-13T06:47:57+5:30
सोहम कठरे याच्या अपघाती मृत्यूनंतर प्रश्न ऐरणीवर, विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सुरक्षितपणे चढता यावे आणि प्रवास करता यावा, याची जबाबादारी निश्चित करावी

लोकलमध्ये ‘स्टुडंट कोच’चा प्रस्ताव १४ वर्षांपासून सरकारकडे धूळ खात; मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष
अनिकेत घमंडी
डोंबिवली - कसारा, कर्जत, बदलापूर, कल्याण - डोंबिवली आदी शहरातून अनेक विद्यार्थी लोकलने ठाणे, मुंबई, नवी मुंबई येथे महाविद्यालयात जातात. त्यांना सकाळच्या वेळी गर्दीचा त्रास सहन करावा लागतो. परिणामी अपघात झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना लोकलच्या एखाद्या डब्यात राखीव आसनव्यवस्थेचा प्रस्ताव २०१२ पासून प्रलंबित आहे. मात्र केंद्र, राज्य शासन त्याचा गांभीर्याने विचार करत नसल्याने मंगळवारी डोंबिवलीच्या सोहम कठरे या बारावीच्या विद्यार्थ्याचा गर्दीमुळे तोल जाऊन मृत्यू झाला.
प्रवासी संघटनेची खंत
माजी खासदार संजीव नाईक, आनंद परांजपे यांनी २०१२मध्ये यासंदर्भात उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्थेसमवेत बैठक घेऊन रेल्वे बोर्ड अध्यक्षांशी यासंदर्भात दिल्लीत जाऊन चर्चा केली होती. काळाची गरज लक्षात घेऊन स्टुडंट कोचसंदर्भात विचार केला जाईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रस्ताव धूळ खात पडल्याची खंत वांगणी, कल्याण - डोंबिवली, दिवा, ठाणे भागातील प्रवासी संघटनांनी व्यक्त केली.
मुंबई विभागाचे रेल्वे अधिकारी सामान्य प्रवाशांसाठी किरकोळ सुविधावगळता फार काही करतील, अशी अपेक्षा आता राहिलेली नाही. शासनाने लोकलचे प्रश्न खरेच गांभीर्याने घेतले आणि केंद्रीय स्तरावरून उपनगरी लोकल सेवा सुधारण्यासाठी अर्थसंकल्पाव्यतिरिक्त भरीव आर्थिक मदत केली, तर दिलासा मिळेल.
मनोहर शेलार, संस्थापक अध्यक्ष, उपनगरी रेल्वे प्रवासी एकता संस्था
मुख्यमंत्र्यांना पत्र
मेट्रोप्रमाणे सर्व लोकल गाड्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे असावेत. विद्यार्थी राखीव डब्यात सुरक्षेच्या दृष्टीने पोलिस तैनात करावेत तसेच परीक्षेच्या वेळेत प्रमुख स्थानकांवर अतिरिक्त सुरक्षा आणि रेल्वे कर्मचारी तैनात करावेत. विद्यार्थ्यांना रेल्वेमध्ये सुरक्षितपणे चढता यावे आणि प्रवास करता यावा, याची जबाबादारी निश्चित करावी, अशी मागणीही विद्यार्थ्यांच्या वतीने अभिनेता आणि सोमय्या कॉलेजचा विद्यार्थी अथर्व वगळ याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे केली आहे.