दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
By मुरलीधर भवार | Updated: June 9, 2023 15:17 IST2023-06-09T15:17:00+5:302023-06-09T15:17:07+5:30
माजी नगरसेवक उगले यांच्या प्रभागासह अन्य दोन प्रभागात पाण्याची समस्या आहे.

दूषित पाणी पुरवठा होत असल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन; मुख्यमंत्र्यांकडे करणार तक्रार
कल्याण - शहरातील पश्चिम भागातील बेतूरकपाडा, ठाणकरपाडा आणि फडके मैदान परिसरातील नागरीकांना पाण्याची समस्या भेडसावत आहे. कमी दाबाने येणारे पाणी देखील दूषित असते. या समस्येबाबत वारंवार पाठपुरावा करुनदेखील समस्या सूटत नसल्याने शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक मोहन उगले यांनी पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांच्या दालनाबाहेरच ठिय्या दिला.
माजी नगरसेवक उगले यांच्या प्रभागासह अन्य दोन प्रभागात पाण्याची समस्या आहे. पाणी दूषित येते. नागरीकांना दूषित पाणी पुरवठा केला जात असल्याने नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला जात आहे. त्याचबरोबर या संदर्भात उगले यांनी आयुक्तांची चार वेळा भेट घेतली. याशिवाय अभियंत्याकडेही हा विषय मांडून झाला. तरी देखील समस्या सूटत नाही. अखेरीस त्यांनी आज कार्यकारी अभियंता मोरे यांचे दालन गाठले. दालनाता कुलूप असल्याने त्यांनी त्याठीकाणी ठिय्या दिला. काही वेळेत मोरे येताच त्यांना दालनात जाण्यापासून उगले यांनी मज्जाव केला. जोपर्यंत समस्या सूटत नाही. तोपर्यंत ठिय्या मागे घेणार नाही असा इशारा दिला.
या समस्येविषयी आमदार विश्वनाथ भोईर आणि शहर प्रमुख रवी पाटील यांना कल्पना दिली आहे. गेल्या पाच दिवसापासून नागरीकांना पाणी आलेले नाही. जे नागरीक पाण्याचे बिल नियमित भरतात. पाणी मिळत नसल्याने या भागाला महापालिकेने पाण्याच्या टँकरद्वारे पाणी पुरवावे अशी मागणी केली असता. त्याला पैसे लागतील असे सांगण्यात येते. हा अजब प्रकार आहे. आज रात्रीपर्यंत ही समस्या सुटणार असे आश्वासन दिल्यावर उगले यांनी ठिय्या मागे घेतला. दरम्यान कार्यकारी अभियंता मोरे यांनी सांगितले की, वा’ल ना दुरुस्त झाला होता. त्याच्या दुरुस्तीचे काम लवकर हाती घेतले आहे.