कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला; १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत नेणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 10:23 IST2025-06-10T10:22:22+5:302025-06-10T10:23:02+5:30
शटल सेवा वाढली नाही

कार्यालयीन वेळा बदलण्याचा प्रस्ताव बासनात गुंडाळला; १५ डब्यांच्या लोकल बदलापूरपर्यंत नेणे गरजेचे
डोंबिवली : दिवा-सीएसटी लोकल सुरू न करणे, १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या न वाढल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढणे आणि ठाणे ते कर्जत-कसारा शटल सेवा न वाढवणे यामुळे मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी व अपघात वाढले. रेल्वेची गर्दी कमी करण्यासाठी सरकारी कार्यालयांच्या वेळा बदलण्याचा प्रस्ताव पुढे आला होता. मात्र तोही मागे पडला.
लष्कराच्या ऑर्डर्सना ‘स्वदेशी’ने उशीर; परदेशी कच्चा मालही लवकर मिळेना
डोंबिवलीत पलावा, कल्याण-शीळ रस्त्यावरील गृहसंकुल, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, आसनगाव पट्ट्यात झपाट्याने वाढते शहरीकरण याबाबत रेल्वे प्रशासन सहकार्य करत नसल्याने समस्या वाढत आहेत. २०१२ मध्ये तत्कालीन खा. आनंद परांजपे यांनी मध्य रेल्वेने कल्याणपर्यंत येणाऱ्या १५ डबा लोकल या बदलापूर, आसनगावपर्यंत वाढवण्याची मागणी केली होती. तो प्रस्ताव रेल्वे बोर्ड, दिल्ली यांनी मंजूर केला होता, मात्र २०१४ नंतर केंद्रात आणि राज्यात भाजप सरकार आल्यानंतर त्या विषयाला बगल दिली गेली. १५ डबा लोकलचा प्रस्ताव कागदावर राहिला. त्यामुळे दिवसेंदिवस ठाणे जिल्ह्यातील समस्या वाढत असल्याचे परांजपे म्हणाले.
माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी कार्यालयीन कामाच्या वेळा बदलणे, कार्यालये स्थलांतर करणे असा प्रस्ताव दिला होता. सरकारी कार्यालयातील ज्या खात्यांचा थेट लोकांशी संबंध नाही अशी खाती उशिरा सुरु करून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवा व जी खाती, विभाग जनतेशी संबंधित आहेत त्यांची कामे सकाळी सुरु करावीत, असा प्रस्ताव होता. तो प्रस्ताव सरकारी व खासगी आस्थापनांनी स्वीकारला असता तर गर्दीचे नियोजन करता आले असते.
मुरबाड, कर्जत पट्ट्यात भरपूर जागा आहे. त्याचा विचार करण्याबाबत पर्याय प्रवासी संघटनांनी सुचवले होते. ते सगळे बासनात गुंडाळले गेले.