भारतातील सर्वात उंचीवर वसलेले गाव कोणते? लोकसंख्या 150 पेक्षाही कमी, जाणून घ्या..!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:12 IST2026-03-17T18:12:16+5:302026-03-17T18:12:27+5:30
15,000 फूट उंचीवर निसर्गाच्या सानिध्यात वसलेल्या गावात एकदा तरी जायलाच हवं!

भारतातील सर्वात उंचीवर वसलेले गाव कोणते? लोकसंख्या 150 पेक्षाही कमी, जाणून घ्या..!
उन्हाळा सुरू होताच अनेकजण सुट्ट्यांसाठी थंडगार भागांत फिरण्याची प्लानिंग करतात. निसर्गरम्य दृश्ये, थंड हवामान आणि शांत वातावरणामुळे पर्वतीय पर्यटनाला विशेष पसंती दिली जात. मात्र, तुम्हाला माहिती आहे का, भारतातील सर्वात उंच गाव कोणते आहे? हे गाव पर्यटकांसाठी विशेष आकर्षण आहे.
हिमाचल प्रदेशात देशातील सर्वात उंच गाव...
हिमाचल प्रदेशातील स्पीती व्हॅलीमध्ये वसलेले कोमिक हे भारतातील सर्वात उंच गाव मानले जाते. समुद्रसपाटीपासून सुमारे 15,000 फूट उंचीवर वसलेले हे गाव निसर्गसौंदर्य आणि शांततेसाठी प्रसिद्ध आहे. येथील पर्वतरांगा, थंड हवामान आणि विरळ वस्तीमुळे हे ठिकाण पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरते.
तांग्युद मठामुळे प्रसिद्ध
कोमिक गावाजवळील तांग्युद मठ (Tangyud Monastery) हे या ठिकाणचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. हा मठ भारतातील सर्वात उंच मठांपैकी एक मानला जातो. याची स्थापना अंदाजे 14व्या शतकात झाली असल्याचे मानले जाते. बौद्ध संस्कृती आणि अध्यात्मिक वातावरणामुळे येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.
अत्यल्प लोकसंख्या
2011 च्या जनगणनेनुसार, कोमिक गावात 150 पेक्षा कमी लोकसंख्या आहे. त्यामुळे हे गाव अत्यंत शांत आणि विरळ वस्तीचे मानले जाते. विशेष म्हणजे, कोमिक गावात पोहोचण्यासाठी तुम्ही आपल्या गाडीचा वापर करू शकता. यामुळेच गाडीने पोहोचता येणारे, हे जगातील सर्वात उंच गाव आहे.
पर्यटनासाठी आकर्षण, पण आव्हानही
येथील तापमान वर्षभर अत्यंत कमी राहते. त्यामुळे येथे जाणे हा एक वेगळा अनुभव असला तरी पर्यटकांसाठी आव्हानात्मकही ठरतो. तरीही, निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी कोमिक हे ‘ड्रीम डेस्टिनेशन’ मानले जाते.