एअर इंडियाच्या विमानात उंदराने घातला धुमाकुळ, अन् मग घेण्यात आला असा निर्णय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2022 19:04 IST2022-04-22T19:02:13+5:302022-04-22T19:04:14+5:30
एका उंदरामुळे विमानतळावर उड्डाणाला विलंब होऊ शकतो? पण आता हे प्रत्यक्षात घडलं आहे. फक्त एका उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाला.

एअर इंडियाच्या विमानात उंदराने घातला धुमाकुळ, अन् मग घेण्यात आला असा निर्णय...
काहीवेळा उंदीर त्यांच्या छोट्याशा कृत्यांमुळे मोठं काम खराब करतात. अनेकदा उदरांनी मोठ्या वस्तू किंवा कंपन्यांमध्ये तसंच घरात अगदी महागड्या वस्तू कुरतडून खराब केल्याचं तुम्ही आजवर ऐकलं किंवा पाहिलं असेल. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का, की एका उंदरामुळे विमानतळावर उड्डाणाला विलंब होऊ शकतो? पण आता हे प्रत्यक्षात घडलं आहे. फक्त एका उंदरामुळे एअर इंडियाच्या विमानाला उशीर झाला.
टाटा समूहातर्फे (Tata Group) संचालित एअर इंडियाची श्रीनगर-जम्मू फ्लाईट (Srinagar Jammu Flight) गुरुवारी विमानात उंदीर दिसल्याने सुमारे दोन तास उशिराने निघाली (Air India Flight Delayed Because of Mouse). उंदरामुळे विमानाला उशीर झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
विमान वाहतूक नियामक नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) या घटनेची चौकशी सुरू केली आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. विमानातून उंदीर बाहेर काढल्यानंतरच विमानाने श्रीनगर विमानतळावरून उड्डाण घेतल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं, या घटनेमुळे उड्डाणाला जवळपास दोन तासांचा विलंब झाला.
अधिकारी म्हणाले की फ्लाइट क्रमांक AI822 ची नियोजित उड्डाणाची वेळ दुपारी २.१५ वाजता होती, परंतु ती ४.१० वाजता निघाली. वृत्तसंस्थेनं या प्रकरणी एअर इंडियाचं म्हणणं जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. टाटा समूहाने २७ जानेवारी रोजी एअर इंडियाचं कामकाज ताब्यात घेतलं आहे. यशस्वी बोली प्रक्रियेनंतर केंद्राने गेल्या वर्षी ८ ऑक्टोबर रोजी टाटा समूहाला ही विमानसेवा विकली.