जळगाव : बामणोद,ता.यावल येथे चुलत मामाच्या साखरपुड्याला जायला निघालेला सोपान सुभाष शिरसाठ (वय २५,रा.देवगाव, ता.जळगाव, मुळ रा.कुसुंबा,ता.चोपडा) हा तरुण अर्ध्या रस्त्यातून परत झाला आणि घरी जाताना राष्ट्रीय महामार्गावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानजीक सख्या मामाच्या ढाब्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत ठार झाल्याची घटना रविवारी दुपारी साडे तीन वाजता घडली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोपान याच्या चुलत मामाचा रविवारी बामणोद, ता.यावल येथे साखरपुडा होता. त्यासाठी सकाळीच तो दुचाकीने (क्र.एम.एच.१९ डी.एम.६६५३) बामणोदकडे निघाला. विदगावपर्यंत गेला व तेथून तो माघारी फिरला. मागे का फिरला याचे कारण कोणालाच माहिती नाही. पाळधीमार्गे घरी जात असताना राष्ट्रीय महामार्गावर कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठानजीक अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात तो जागीच गतप्राण झाला. घटनास्थळावर तरुणाचा मृतदेह पाहून काही लोकांनी पाळधीत माहिती दिली. एका रुग्णवाहिकेतून त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात आणण्यात आले. तेथे वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. मृतदेहाची ओळख पटली नसल्याने डॉ.अहिरे यांनी पाळधी पोलिसांना घटनेची माहिती कळविली. दरम्यान, गेल्या आठ दिवसापासून महामार्ग तसेच राज्यमार्गावर अपघातांची मालिकाच सुरु झालेली आहे.