लोकमत न्यूज नेटवर्क
यावल : दोघामधील सुरू असलेले भांडण सोडवल्याचा राग येऊन भांडण सोडविणाऱ्यास काठीने मारहाण करत त्याच्यावर चाकूहल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री साडेनऊच्या सुमारास येथील स्वामिनारायण नगरात घडली. जखमीवर उपचारनंतर रविवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात पाच जणाविरुद्ध दंगलीसह जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे.
येथील स्वामिनारायण नगरातील रहिवासी राहुल संजय चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वृत्त असे की, शहरात उमेश घारू व भारत धर्मा घारू यांचा दुचाकीचा कट बापू महाजन यास लागल्यावरून बापू महाजन यांच्यासोबत भांडण सुरू होते ते सोडविण्याचा प्रयत्न केल्याने अमर जगू घारू व उमेश जगू घारू यांनी त्यांचे दोन्ही हात धरून धर्मा जगू घारू याने पोटात बरगडीजवळ दुखापत केली, तर करण उमेश घारू व भारत धर्मा घारू यांनी हातात काठ्या घेऊन राहुल यांचा चुलत भाऊ एकनाथ दुर्गादास चव्हाण तसेच महेंद्र दुर्गादास चव्हाण व चुलते दुर्गादास गणेश चव्हाण अशांना काठ्यांनी मारहाण केली व शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अमर घारू, उमेश घारू, धर्मा घारू, करण घारू व भारत घारू या पाच जणांविरुद्ध यावल पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अदखलपात्र गुन्हा
याचबरोबर दुसऱ्या फिर्यादी नुसार राहुल संजू चव्हाण, संजू गणेश चव्हाण, दुर्गादास गणेश चव्हाण, प्रल्हाद गणेश चव्हाण यांनी विश्वनाथ घारू यास मारहाण करून शिवीगाळ केली व जिवे ठार मारण्याची धमकी दिली म्हणून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.