महामार्गावरील वळण ठरतेय धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 10:05 PM2019-11-13T22:05:52+5:302019-11-13T22:06:02+5:30

नशिबारादजवळ चौपदरीकरणाची डोकेदुखी : खड्यांमुळे अपघातांचा धोका वाढला

 Turning the highway is dangerous | महामार्गावरील वळण ठरतेय धोकादायक

महामार्गावरील वळण ठरतेय धोकादायक

Next

प्रसाद धर्माधिकारी ।
नशिराबाद : जळगाव -नशिराबाद -भुसावल महामार्गावर दिवसेंदिवस वाढत असलेल्या खड्ड्यांमुळे वाहने चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागत आहेत. चौपदरीकरणाच्या कामामुळे ठिकठिकाणी वळण रस्त्यांचा वापर करावा लागत आहे. मात्र वळण घेणार या रस्त्यावरच काही ठिकाणी खड्डे तर काही ठिकाणी डांबरच उखडल्याने वाहन चालवणे जिकरीचे ठरत मृत्यूला आमंत्रण दिले जात आहे. मात्र ढिम्म प्रशासन व ठेकेदार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालकांना अडचणीना सामोरे जावे लागत आहे.
जळगाव -नशिराबाद भुसावल महामार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी डांबर उखडल्याने वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चौपदरीकरणाचे काम दोन्ही बाजूंनी सुरू आहे. काही ठिकाणी खोदून ठेवल्याने व पर्यायी रस्ता नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर धूळ उडत आहे. त्यामुळे अनेकांना श्वसनासह,डोळ्यांचा विकार होत आहे.
प्रवाशांच्या जीवाशी पोरखेळ
चौपदरीकरणाच्या कामात नुकत्याच तयार केलेल्या रस्त्यांवर पावसाच्या अतिवषार्वाने अनेक ठिकाणी खड्डेच खड्डे पडले आहे. पर्यायी रस्त्यांच्या वळणांवर खड्ड्यांमुळे अपघाताचा धोका वाढला आहे. भादली चौफुली रोडवर महालक्ष्मी मंदिराजवळ माती मुरमाचा टेकडीच असल्याने रस्ता ओलांडताना शेतकऱ्यांसह नागरिकांना अतोनात हाल होत आहे.
लोकप्रतिनिधी गप्प...
जळगाव भुसावळ महामार्गावरून अनेक पुढारी ,लोकप्रतिनिधी ये जा करतात. मात्र त्यांनाही खड्ड्यांचा त्रास होत असला तरी कोणीही यावर आवाज उठवत नाही. लोकप्रतिनिधी याबाबत गप्प का? असा संताप व्यक्त होत आहे. काही ठिकाणी तर ये जा करतांना रस्ताही समजत नाही.त्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. कुंभकर्णी झोपी प्रशासन जागे कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे

खड्ड्यातून तारेवरची कसरत
नशिराबाद उड्डाणपूल , डॉ उल्हास पाटील रुग्णालय, ते पुढील काही अंतरापर्यंत मोठ्या प्रमाणावर डांबर उघडले असून ठिकठिकाणी खड्डे पडलेले आहे त्यातच लगतच बाजूंना खोदून ठेवले असल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. तारेवरची कसरत म्हणजे एक सर्कस आहे. खड्डेयुक्त रस्ते, वळण रस्ते या ठिकाणी अनेकवेळा वाहने घसरून अपघातही होतं आहेत. अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागला. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.दूरदर्शन टावर जवळ तर डांबर मोठ्या प्रमाणात उखडले असून खड्डेच खड्डे वाढत आहे.

मान पाठीचे दुखणे वाढले...
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेकांना मान पाठ दुखण्याचे विकार जडले आहे. अनेकदा ओरड होवूनही रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची तसदी प्रशासन वा ठेकेदार घेत नसल्याने नागरिक प्रवासी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.

Web Title:  Turning the highway is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.