नशिराबादला साडेतीन हजार कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:58 IST2020-02-11T12:58:24+5:302020-02-11T12:58:58+5:30

फसवणूक होत असल्याची तक्रार, तहसीलदारांना निवेदन

Three and a half thousand families in Nashirabad are deprived of ration grain | नशिराबादला साडेतीन हजार कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित

नशिराबादला साडेतीन हजार कुटुंबे रेशन धान्यापासून वंचित

नशिराबाद : येथील ३ हजार ५०० कुटुंबांना सरकारमान्य स्वस्त धान्य दुकानातून रेशन धान्य मिळत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रेशन कार्डचा उपयोग फक्त नागरी रहिवासी पत्त्यासाठी होत असून खऱ्या लाभापासून अर्थात धान्यापासून कुटुंब वंचित आहे. महिनाभरात कुटुंबियांना धान्यपुरवठा सुरू न झाल्यास अन्यथा मंत्रालयात धाव घेणार असल्याचे ेमाजी सरपंच पंकज महाजन यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केला आहे.
माजी सरपंच पंकज महाजन यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनाचा आशय असा की, नशिराबाद येथे पाच स्वस्त धान्य दुकाने आहेत. एकूण सहा हजार कुटुंब रेशन कार्डधारक आहे त्यापैकी २ हजार ५०० कुटुंबांना स्वस्त धान्याचा लाभ मिळत आहे. मात्र सुमारे ३५०० कुटुंबे धान्यापासून अद्यापही वंचित आहेत. अनेकदा ओरड होवूनही याकडे दुर्लक्ष झाले. वंचित कुटुंबियांना धान्य मिळावे, अशी अपेक्षा आहे, असे या निवेदनात म्हटले आहे.
ज्या कुटुंबियांना स्वस्त धान्य दुकानदारांकडून धान्य मिळत आहे, त्यांचीसुद्धा दुकानदारांकडून लुबाडणूक व पिळवणूक होत आहे. अनेकदा तक्रार येवूनही याकडे डोळेझाक होत आहे.
येथील रहिवासी अनिल वामन कोल्हे यांचे रेशनकार्ड नशिराबाद येथील स्वस्त धान्य दुकानदार हिरालाल चौधरी यांच्या दुकानाची संलग्न आहे. कोल्हे यांच्या कुटुंबात चार सदस्य असल्यावर त्यांना प्रत्यक्षात तीन लोकांचे रेशन धान्य मिळत आहे. मात्र आॅनलाइन डाटा तपासणी केली असता, त्या कुटुंबाला प्रत्यक्ष बारा किलो गहू व नऊ किलो तांदूळ एवढे धान्य मिळायला पाहिजे. गरीब व अडाणी समाजबांधवाची फसवणूक केली जात असल्याचे निवेदनात म्हटले अहे. त्यांना प्रत्यक्षात नऊ किलो गहू व सहा किलो तांदूळ मिळत आहे. संबंधित दुकानदारांची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
निवेदनातील मागण्या
गावातील तीन हजार पाचशे कुटुंबास व जळगाव तालुक्यातील स्वस्त धान्यापासून वंचित अन्य कुटुंबांनाही त्वरित धान्य सुरू करण्यात यावे.
नशिराबाद गावात स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत असलेली लूबाडणूक थांबवावी.
रेशनदूकानदारांची चौकशी व कारवाई करावी.
गावातील साडेतीन हजार वंचित कुटुंबांना स्वस्त धान्य दुकानातून एक महिन्यात धान्य न मिळाल्यास सर्व वंचितांना घेऊन १० मार्च रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दालनात धडक देऊन हा गंभीर विषय मार्गी लावण्याकरिता साकडे घालण्यात येईल निवेदनात म्हटले आहे.
गावात काही दुकानांमध्ये रेशनकार्डधारकांचे ठसे मिळत नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळेही धान्य देण्यास टोलवाटोलवी होती, असा अनुभव काही ग्राहकांना येत असल्याची ओरड व्यक्त होत आहे.

 

Web Title: Three and a half thousand families in Nashirabad are deprived of ration grain

टॅग्स :Jalgaonजळगाव