अमळनेर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतर्गत तळई ते आडगाव व आडगाव तांडा या नऊ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे काम दोन वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे. या रस्त्याचे रखडलेले काम कधी पूर्ण होणार याबाबत आडगाव येथील शेतकरी व नागरिकांनी महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेकडे वेळोवेळी निवेदने देऊन व प्रत्यक्ष अधिकारी वर्गाचे भेट घेऊन. पाठपुरावा केला मात्र तरीसुद्धा या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, आडगावच्या नागरिकांनी याप्रश्नी उच्च पातळीवरून चौकशी व्हावी अन्यथा आम्ही आंदोलनात्मक पवित्रा घेऊ, असा इशारा दिला आहे.
हे काम मंजूर अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसल्याची तक्रार आहे तळई गावानजीक नऊमुठी नाल्यातील व आडगाव येथील नाल्यातील अशी दोन्ही नाल्यातील कामे अजूनही अपूर्ण अवस्थेत आहेत त्यामुळे या दोन्ही ठिकाणी अपघात होऊन जीवितहानी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे हा मार्ग आडगाव येथून तळई जाण्यासाठी कमी अंतराचा मार्ग आहे. तसेच शेत शिवारात जाण्यासाठी आडगाव व परिसरातील शेतकऱ्यांसाठी ये-जा करण्याकरता सोयीचा रस्ता आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.